Ambernath News: अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत सुरक्षेचे कुठलेही नियम न पाळता कामगारांना मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा एक अत्यंत भयंकर प्रकार समोर आला आहे. सुरक्षेची कोणतीही साधने न देता होर्डिंग लावण्याचे काम सुरू असताना एका 24 वर्षीय निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सुरक्षेचा बोजवारा उडाल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून कामगारांच्या जिवापेक्षा पैसे महत्त्वाचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
काय आहे प्रकरण?
अंबरनाथमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्याच्या बाळकुम परिसराचा रहिवासी असलेल्या इंद्रेश राजभर (वय 24) या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ भागात लोखंडी होर्डिंग लावण्याचे काम सुरू होते. यावेळी इंद्रेश राजभर हा तरुण तिथे काम करत होता. होर्डिंग लावताना लोखंडी सळी उचलून बाजूला ठेवत असताना, जवळूनच गेलेल्या हायव्होल्टेज विजेच्या तारेचा सळीला स्पर्श झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.
( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )
ना सेफ्टी बेल्ट, ना हेल्मेट...
या कामाच्या ठिकाणी ना सेफ्टी बेल्ट होता, ना हेल्मेट, कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने न देता थेट मृत्यूच्या तोंडात ढकलण्यात आले होते. हायव्होल्टेज तारेचा स्पर्श होताच इंद्रेशला काळजाचा थरकाप उडवणारा विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो तिथेच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेचे नगरसेवक राजू वालेकर यांच्याकडून अंबरनाथ शहरात अनधिकृतपणे लावल्या जाणाऱ्या होर्डिंग आणि बॅनरवर कारवाईची मागणी केली जात आहे. मात्र, पालिका प्रशासन या गंभीर बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला आहे, आता तरी प्रशासन जागा होणार का आणि आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन कारवाई करणार, असा संतप्त सवाल राजू वालेकर यांनी उपस्थित केला आहे.