अमजद खान
माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी समाज रस्त्यावर उतरतो. आंदोलन करतो. पण एका प्राण्याला न्याय मिळवून देण्यासाठी जर कुणी रस्त्यावर उतरत असेल तर. तुम्हाला त्यावर विश्वास बसत नाही ना. पण हो तसं घडलं आहे. ते ही अंबरनाथमध्ये. अंबरनाथमध्ये एका मांजरीला न्याय मिळवून देण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणात प्राणी प्रेमी सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मांजरीची 12 व्या मजलावरून धक्का देवून हत्या करण्यात आली होती. त्याचा व्हिडीओ ही व्हायरल झाला होता. त्या आरोपीला अटक व्हावी यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते.
अंबरनाथमध्ये मांजरीला 12 व्या मजल्यावरून ढकलून दिल्याची घटना 26 जुलैला घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही. या मांजरीला न्याय मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमींनी अंबरनाथमध्ये कँडल मार्च काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक या मार्गावर हा कँडल मार्च काढण्यात आला होता. या मार्चमध्ये प्राणीप्रेमी हातात निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते. ते मुके असले म्हणून काय झालं त्यांना ही प्रेमाने वागवले पाहीजे. तो ही एक जीव आहे अशी भावना यावेळी प्राणी प्रेमींनी व्यक्त केली. शिवाय ज्या क्रुरतेने मांजरीची हत्या केली ते निषेधार्ह असल्याचं ही त्यांनी सांगितलं.
अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील रॉयल फ्लोरा संकुलात 26 जुलै रोजी ही घटना घडली होती. राजू साळुंके नामक व्यक्तीने एका मांजरीला 12 व्या मजल्यावरून ढकलून दिलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्राणीप्रेमींनी आरोपीवर कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलीस कारवाई करत नसल्याचा प्राणीप्रेमींचा आरोप आहे. त्यामुळेच मृत मांजरीला न्याय मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमींनी अंबरनाथमध्ये हा कँडल मार्च काढला. या कँडल मार्चची संपूर्ण अंबरनाथमध्ये चर्चा होत आहे.
जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात स्पष्ट दिसत होतं की मांजर इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील कठड्यावर बसली होती. त्यावेळी तिथे तो व्यक्ती आला. त्याने तिथून थेट त्या मांजरीला धक्का देत खाली ढकलून दिले. यात मांजरीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र हे क्रुर कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले होते. मांजर मेल्यानंतर तिला परस्पर दफन ही करण्यात आलं. पण प्राणी प्रेमींच्या सतर्कतेमुळे त्या मांजरीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन ही करण्यात आले होते. पोलिसांवरही त्यावेळी कारवाई करण्याचा दबाव होता. त्यांनी गुन्हा तर नोंदवला पण अटक केली नाही. त्यामुळे प्राणी प्रेमींना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.