Badlapur-Karjat Local: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक मोठे 'गिफ्ट' दिले आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय आज (बुधवार, 26 नोव्हेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या बदलापूर-कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी (3rd & 4th) लाईन टाकण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (CCEA) मंजुरी दिली आहे.
मुंबईकरांचे हाल थांबणार!
ठाणे आणि मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी बदलापूर-कर्जत मार्गाचे विस्तारीकरण हा अत्यंत मोठा दिलासा आहे. सध्याच्या दोन लाईनमुळे या मार्गावर नेहमीच लोकल वाहतुकीची मोठी कोंडी होते, ज्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो.
या मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन तयार झाल्यानंतर खालील मोठे बदल होतील.
प्रवासी क्षमता वाढेल: मुंबई उपनगरीय प्रवासी वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
लोकलची संख्या वाढणार: नवीन लाईनमुळे अधिक लोकल चालवणे शक्य होईल.
वाहतूक कोंडी कमी: लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी आता वेगवेगळे ट्रॅक उपलब्ध होतील, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि वेळेची बचत होईल.
वेळेवर धावणाऱ्या लोकल: ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारल्याने गाड्या वेळेवर धावण्यास मदत होईल, ज्यामुळे प्रवाशांचे दैनंदिन हाल कमी होतील.
( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भारतीय रेल्वेसाठी दोन 'मल्टी-ट्रॅकिंग' प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण 2,781 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधील चार जिल्ह्यांमध्ये रेल्वे नेटवर्क सुमारे 224 किलो मीटरने वाढणार आहे.
यामधील, देवभूमी द्वारका (ओखा)–कानालुस डबलिंग प्रकल्प: 141 किलोमीटरचा हा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. बदलापूर–कर्जत तिसरी आणि चौथी लाईन: मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग 32 किलो मीटर लांबीचा आहे.
कुणाला मिळणार फायदा?
या दोन प्रकल्पांचा थेट लाभ सुमारे 585 गावांमध्ये राहणाऱ्या 32 लाख लोकसंख्येला होणार आहे. गुजरातमध्ये द्वारकाधीश मंदिरापर्यंतची जोडणी अधिक सुलभ होणार असल्याने, तेथील पर्यटन आणि अर्थव्यवहारालाही मोठा फायदा मिळेल.
भारतीय रेल्वेच्या नेटवर्क वाढीतील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे, ज्यामुळे वेगवान, स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीकडे देशाने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे.