बदलापूर ते मुंबई अवघ्या 40 मिनिटात, पनवेलला जोडणारा बोगदा ठरणार गेमचेंजर; कधीपासून होणार सुरू?

हे बोगदे ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारे गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
बदलापूर:

निनाद करमरकर, प्रतिनिधी

बडोदा जेएनपीटी महामार्गावर बदलापूर ते पनवेल असे सव्वाचार किलोमीटर लांबीचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे दोन समांतर बोगदे तयार करण्यात आले आहेत. हे बोगदे ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारे गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहेत. 'एनडीटीव्ही मराठी'ने थेट या बोगद्यांच्या आत जाऊन कामाचा आढावा घेतला आहे.

बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचं काम पूर्णत्वाला आलं असून बदलापूर ते पनवेल हे दोन समांतर बोगदे हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी बदलापूरहून डोंगर फोडून तब्बल सव्वाचार किलोमीटर लांबीचे दोन समांतर बोगदे पनवेलपर्यंत तयार करण्यात आले आहेत. हे दोन्ही बोगदे प्रत्येकी 22 मीटर रुंद असून दोन्ही बोगद्यांमध्ये चार-चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्यांना आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत. या बोगद्यांच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात अवघ्या 15 महिन्यांतच दोन्ही बोगद्यांचं काम पूर्णत्वाला आलं आहे. बदलापूरमधून हे बोगदे खोदायला सुरुवात करून त्याचं पनवेल दिशेला तोंडही उघडण्यात आलं आहे. आता बोगद्यांच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचं काम केलं जात असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत. दरम्यान मार्चपर्यंत हे बोगदे वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याची माहिती आहे. यामुळे बदलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोगद्यामुळे सीएसएमटीला जाणाऱ्यासाठी लागणारा प्रवास अवघ्या 40-50 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. आता या प्रवासासाठी तब्बल अडीच तास लागतात.  

Advertisement

नक्की वाचा - चष्म्यापासून मुक्ती, मुंबईतील फार्मा कंपनीच्या Eyedrops ना केंद्राची मंजुरी; अवघ्या 15 मिनिटात दिसेल परिणाम

बडोदा आणि जेएनपीटीला जोडणारा हा महामार्ग बदलापूर शहराजवळून जावा यासाठी मुरबाड विधानसभेचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी मोठा पाठपुरावा केला होता. या महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या दोन्ही बोगद्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी बोगद्याची पाहणी करून कामगारांचं कौतुक केलं. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यांमुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे. नवी मुंबई विमानतळाला सुद्धा या महामार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि आसपासच्या परिसरातून नवी मुंबई आणि एअरपोर्टला जाण्यासाठी हा रस्ता मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - विराट कोहली टॉपवर, 66 कोटींचा भरला टॅक्स; सचिन आणि हार्दिकचा टॅक्स पाहून हैराण व्हाल!

या महामार्गावरून जेएनपीटी बंदराकडे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुद्धा होणार असून त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या पट्ट्यात या महामार्गाला लागून कमर्शियल हब आणि गोदामसुद्धा उभे राहू शकणार असून त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे बडोदा जेएनपीटी महामार्ग ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आणणार आहे. या बोगद्यांचा सर्वात आधी 'एनडीटीव्ही मराठी'ने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला आहे. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत हा बोगदा विक्रमी वेळेत पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन केलं. 

Advertisement