विशाल पाटील, प्रतिनिधी
Dahi Handi 2025 : कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहीहंडीचा जल्लोष शिगेला पोहोचला आहे. शहरातील गल्लीबोळांपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत गोविंदा पथकांची जयघोष सुरू असून, यावर्षी दहा थरांचा विक्रम होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पारंपरिक आणि आधुनिक दहीहंडी स्पर्धांसाठी पथके सज्ज झाली आहेत. गिरगाव, ठाणे, दादर, परळ, घाटकोपर, विरारसह उपनगरांमध्ये तब्बल शेकडो हंड्या सजवण्यात आल्या आहेत. बक्षीस रकमेची शर्यतही रंगतदार ठरली असून, काही ठिकाणी कोटीच्या घरात पारितोषिके जाहीर झाली आहेत. त्यामुळे गोविंदांचा उत्साह आणखीनच वाढला आहे.
( नक्की वाचा : Dahi Handi : राजकारणात 'गोविंदा आला रे आला', ठाकरेंना सलामी, प्रो गोविंदामधून 'जय जवान'चा विषयच संपला! )
गोविंदा पथकांची विशेष काळजी
यंदा पथकांनी विशेष सराव शिबिरे घेतली आहेत. सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे पाळल्या जात आहेत. उंच थरांसाठी हेल्मेट, गुडघे व कोपर संरक्षक, तसेच विमा कवच देण्यात आले आहे. अपघात टाळण्यासाठी महापालिका व पोलिसांनी ठिकठिकाणी मदत केंद्रे उभारली आहेत.
10 थर लागतील का याकडे सर्वांचे लक्ष
दहा थरांचा विक्रम करण्याचा प्रयत्न होणार का, याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. गेल्या काही वर्षांत नऊ थरांपर्यंत पोहोचलेल्या पथकांनी यंदा विक्रम मोडण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहेत. सणाच्या उत्साहात मुंबई पुन्हा एकदा ‘गोविंदा आला रे आला'च्या घोषणांनी दुमदुमली आहे.