अमजद खान, प्रतिनिधी
मुंबईच्या जवळ असलेल्या डोंबिवलीकरांना रोज वेगवेगळे त्रास सहन करावे लागतात. लोकलची गर्दी, वाहतुकीची कोंडी, अनधिकृत घरं, भटके कुत्री या डोंबिवलीकरांच्या समस्या अद्यापही कायम आहेत. त्यातच पावसाळा आला की यावर्षी कोणता पाऊस बघायला मिळणार? ही चिंता डोंबिवलीकरांना सतावत असते.
कधी हिरवा पाऊस, कधी गुलाबी रस्ते, तर कधी हिरवा-निळा-लाल रंगाचा नाला, या सारख्या प्रदूषणाच्या समस्येसाठी डोंबिवली नेहमीच चर्चेत असते. डोंबिवली एमआयडीसीमध्ये सुरु असलेल्या रासायिनक कारखान्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाल्याच्या तक्रारी नेहमी ऐकायला मिळतात. त्यातच डोंबिवलीत निळ्या रंगाचा पाऊस पडल्याची चर्चा सुरू झाली असून निळ्या रंगाच्या पाण्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
आज (शनिवार, 7 जून) ठाणे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. डोंबिवलीतही सकाळपासून पावसाची हजेरी होती. या पावसानंतर औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील रस्ते निळ्या रंगाचे झाले. एमआयडीसी परिसरात डाय बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यामधून बाहेर पडलेला फ्लोरोसीनचा हवेतील पाण्याशी संपर्क झाल्यामुळे जमिनीवरील पाणी हिरव्या रंगाचे झाल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी देखिल डोंबिवलीत हिरवा पाऊस पडल्याच्या वावड्या उठल्या होत्या. एरव्ही डोंबिवलीतील प्रदूषणाबाबत डोळ्यावर कातडे ओढलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या परिसरातील झाडांची पाने, माती यांचे नमुने गोळा करून घेऊन जातात, पण अहवालात ठोस काहीच स्पष्ट होत नसल्यानं परिसरातील रहिवाशी त्रस्त आहेत.
( नक्की वाचा : बायकोचं मुंडकं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला! थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाचं काय आहे कारण? )
महाराष्ट्रात दुसरा क्रमांक
देशातील प्रदूषणकारी शहरांमध्ये डोंबिवलीचा 14 वा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांत चंद्रपूरनंतर डोंबिवली दुसऱ्या क्रमांकावर आहे. डोंबिवलीतील रासायनिक कारखाने रात्रीच्या वेळी हवेत वेगवेगळे घातक वायू आणि नाल्यांसह अगदी गटारांत लाल-हिरव्या रंगाचे पाणी सोडून देतात. प्रदूषण टाळण्याकरिता प्रक्रिया करणाऱ्या प्लांटमध्ये त्यांनी हे पाणी सोडले तर अशा कारखान्यांच्या खऱ्या पाणी वापराचा भांडाफोड होईल, असा दावा करण्यात येत आहे.
कंपन्यांमधील बॉयलर चालवण्याकरिता लागणारा कोळसा रस्त्यांवर टाकला जातो. त्याचा चुरा करून उघड्यावर ठेवला जातो. यामुळे एमआयडीसीलगतच्या निवासी वसाहतींमध्ये राहणाऱ्यांच्या घरी कोळशाच्या काळ्या भुकटीचे थर फर्निचरवर दिसतात.
या परिसरात उभ्या केल्या जाणाऱ्या मोटारींवर, तेथील झाडा-पानांवर वेगवेगळ्या रंगाचे थर पसरलेले असतात. रहिवाशांना खोकला, डोळे चुरचुरणे, दमा असे अनेक विकार जडलेले आहेत. विशेष म्हणजे डोंबिवलीमधील उच्चभ्रू, प्रतिष्ठित मंडळींचे बंगले व निवासस्थाने याच प्रदूषित पट्ट्यात आहेत. त्यामुळेच शनिवारी सायंकाळनंतर निळ्या पावसाची चर्चा सुरू झाली आहे. ही परिस्थिती सुधारली नाही तर तीव्र आंदोलन करू अशा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.