KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा (KDMC) अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी कामगारांच्या बदली आदेशात मयत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट केल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यानंतर महापालिकेने टिटवाळा परिसरात राहणाऱ्या एका गरीब आदिवासी विधवा महिलेला तब्बल 2 लाख 33 हजार रुपये मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे.
काय आहे प्रकरण?
टिटवाळ्यातील गणेश विद्यालयाजवळ असलेल्या कातकरी पाड्यामध्ये सुमित्रा उर्फ पारु बळीराम कातकरी राहतात. त्यांचे घर म्हणजे एक छोटीशी झोपडी आहे. सुमित्रा कातकरी विधवा आहेत आणि घरात कमावता पुरुष नसल्यामुळे त्या इतरांच्या घरातील धुणीभांडी करून त्यांच्या तीन मुलांचे पोट भरतात.या तुटपुंज्या कमाईतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
( नक्की वाचा : CIDCO Home : नवी मुंबईतील सिडकोच्या घरांचे दर 10 टक्क्यांनी कमी; 17,000 घरांच्या लॉटरीबाबत सरकारचा मोठा निर्णय )
केडीएमसीच्या प्रभाग क्षेत्र एक अंतर्गत येणाऱ्या या परिसरातील त्यांच्या झोपडीला मालमत्ता कर वसूली विभागाने त्यांना थेट 2,23,000 रुपये इतका कर आकारला आहे. एवढेच नव्हे तर, हा कर वेळेत न भरल्यास त्यांच्या झोपडीवर जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा देखील नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
गरीब महिलेसमोर मोठं संकट
इतकी मोठी रक्कम पाहून सुमित्रा कातकरी हवालदिल झाल्या आहेत. त्यांना इतका मोठा कर भरणे शक्य नाही. त्यांची झोपडी विकूनही ही रक्कम उभी राहू शकत नाही. महापालिकेच्या या अजब कारभाराच्या नमुन्यामुळे त्या मोठ्या मानसिक धक्क्यात आहेत.
( नक्की वाचा : Badlapur : बदलापूरच्या काँग्रेस नेत्याची हत्या झाल्याचं 3 वर्षांनी उघड, नवऱ्यानं घरात आणला होता साप आणि.... )
महापालिकेच्या या कृतीचा श्रमजीवी संघटनेनं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, या आदिवासी महिलेच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी राहील. तसेच, या संपूर्ण प्रकरणाबद्दल श्रमजीवी संघटना कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला जाब विचारणार आहे. मयत कर्मचाऱ्यांनंतर आता गरिबीत जीवन जगणाऱ्या विधवेला अशा प्रकारे नोटीस पाठवल्याने महापालिकेची कार्यप्रणाली गंभीररित्या चर्चेत आली आहे.