BMC News: 'भारत तेरे तुकडे होंगे...'ची घोषणा थेट मुंबई महापालिकेत? महापौरांच्या गंभीर आरोपानं नवं वादळ

BMC News: मुंबई महानगरपालिकेत देशविरोधी घोषणाबाजी आणि थेट पंतप्रधानांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप महापौर रितू तावडे यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
BMC News: निर्लज्ज विरोधकांना देशाभिमानी मुंबईकर माफ करणार नाहीत, असा इशारा महापौरांनी दिला आहे.
मुंबई:

BMC News:  मुंबई महानगरपालिकेत देशविरोधी घोषणाबाजी आणि थेट पंतप्रधानांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप महापौर रितू तावडे यांनी केला आहे. मुंबईच्या लोकशाही मंदिरात झालेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून विरोधकांच्या या कृत्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. देशविरोधी मानसिकतेचे लाड पुरवणाऱ्या या नगरसेवकांना मुंबईकर जनताच रस्त्यावर योग्य धडा शिकवेल, असा घणाघाती इशारा महापौरांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं?

महापौर रितू तावडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर काही नगरसेवकांनी सर्व नैतिक मर्यादा बाजूला ठेवत देशविरोधी घोषणा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या मुंबईकरांनी विश्वासाने निवडून सभागृहात पाठवले, त्याच जनतेच्या आणि देशाच्या पाठीत गद्दारीचा खंजीर खुपसण्याचे काम विरोधकांनी केले आहे. कधीकाळी जेएनयूमध्ये ऐकायला मिळालेल्या भारतविरोधी घोषणा आज थेट महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या पवित्र लोकशाही मंदिरात देण्याइतपत विरोधकांची मजल गेली असल्याचा थेट आरोप महापौरांनी केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : KDMC News: केडीएमसीत राजकीय भूकंप! ठाकरे गट अन् मनसे आले एकत्र; भाजपाने दिला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा )

पंतप्रधानांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

या संतापजनक घोषणाबाजीसोबतच 140 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. सभागृहाची शिस्त, प्रतिष्ठा आणि सभाशास्त्र पायदळी तुडवत देशविरोधी ताकदींचे लाड पुरवणाऱ्या या तुकडे तुकडे गँगच्या मानसिकतेचा महापौरांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

राजकीय वैफल्यातून विरोधक इतक्या खालच्या पातळीवर घसरले असून थेट देशाचे तुकडे करण्याची आणि पंतप्रधानांना शिवीगाळ करण्याची भाषा करत आहेत. या निर्लज्ज विरोधकांना देशाभिमानी मुंबईकर आणि संपूर्ण भारतातील जनता कधीही माफ करणार नाही, असे सांगत अशा देशविरोधी ताकदींना जनताच रस्त्यावर योग्य तो धडा शिकवेल, असा सडेतोड इशारा महापौर रितू तावडे यांनी दिला आहे.


Topics mentioned in this article