Mumbai Sea: मुंबईची शान असलेला समुद्र लवकरच इतिहास जमा होणार? पुढच्या पिढीला दिसणार फक्त...

Mumbai sea: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे सौंदर्य आणि तिची शान असणारा अथांग समुद्र एका अत्यंत मोठ्या संकटात सापडला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai Sea: मुंबईचा प्रसिद्ध समुद्र लवकरच मृतावस्थेत जाण्याची भीती आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Mumbai sea pollution crisis: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे सौंदर्य आणि तिची शान असणारा अथांग समुद्र एका अत्यंत मोठ्या संकटात सापडला आहे. दररोज लाखो लोकांना आकर्षित करणारा आणि मुंबईकरांच्या सुख-दुःखाचा साक्षीदार असलेला हा समुद्र आता हळूहळू आपला श्वास गमावत चालला आहे. 

एका धक्कादायक अहवालानुसार, मुंबईचा हा प्रसिद्ध समुद्र लवकरच मृतावस्थेत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. समुद्रात अनिर्बंधपणे सोडले जाणारे सांडपाणी, टनवारीने टाकला जाणारा कचरा आणि कधीही नष्ट न होणारे प्लास्टिक यामुळे समुद्राचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जर आपण आताच योग्य पावले उचलली नाहीत, तर येत्या काही वर्षांत मुंबईच्या किनाऱ्यांवर फक्त एक मोठी गटारगंगा उरेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

मुंबईची ओळख असलेल्या या समुद्राची नेमकी काय अवस्था होत आहे आणि याचा फटका सामान्य माणसापासून ते निसर्गापर्यंत कसा बसत आहे, याचा हा सविस्तर अहवाल डोळे उघडणारा आहे.

( नक्की वाचा : मोठी बातमी! येत्या 5 वर्षांत देशातले प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन गायब होणार? वाचा काय आहे कारण? )
 

मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आणि...

समुद्राच्या पाण्याचा दर्जा कमालीचा घसरल्यामुळे सर्वात मोठा फटका मुंबईतील पारंपरिक मच्छिमारांना बसला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईच्या कोळीवाड्यातील मच्छिमारांना किनाऱ्यापासून जेमतेम 10 ते 20 किलोमीटर अंतरापर्यंत अगदी सहज आणि उत्तम दर्जाचे मासे मिळायचे. मात्र, आता किनाऱ्यालगतचे पाणी इतके दूषित झाले आहे की, तिथे माशांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. 

आता चांगल्या माशांच्या शोधासाठी मच्छिमारांना मुंबईपासून तब्बल 100 किलोमीटर इतके आत खोल समुद्रात जावे लागत आहे. एवढ्या दूर जाऊनही पूर्वीसारखे मासे मिळतील याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही, ज्यामुळे मासेमारीच्या व्यवसायावर आणि मच्छिमारांच्या रोजगारावर मोठी कुऱ्हाड कोसळली आहे.

केमिकल आणि सांडपाण्यामुळे समुद्री अन्नसाखळी उद्ध्वस्त

मुंबईच्या समुद्रात दररोज कोट्यवधी लिटर सांडपाणी थेट सोडले जाते. यामध्ये केवळ घरातील मैला किंवा सांडपाणी नसून, कारखान्यांमधून निघणारे घातक केमिकल युक्त पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात समाविष्ट असते. या विषारी केमिकल्समुळे समुद्रातील माशांसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक अन्न आणि वनस्पती नष्ट होत आहेत. अन्नच मिळत नसल्याने मासे किनाऱ्या सोडून अधिक खोल आणि सुरक्षित पाण्याच्या शोधात जात आहेत.

Advertisement

यातूनच एक मोठा जागतिक धोका देखील निर्माण होत आहे. संपूर्ण पृथ्वीसाठी लागणाऱ्या एकूण ऑक्सिजन पैकी सुमारे 60 ते 70 टक्के ऑक्सिजनची निर्मिती ही समुद्री वनस्पती आणि सूक्ष्म जीवांच्या माध्यमातून होत असते. मात्र, मुंबईच्या समुद्रात होत असलेल्या या प्रचंड प्रदूषणामुळे या समुद्री वनस्पतींच्या वाढीमध्ये आणि ऑक्सिजन निर्मितीच्या प्रक्रियेत खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. 

मुंबईचा विचार केला तर कफ परेड आणि उपनगरांच्या किनारपट्टीच्या भागात हे प्रदूषण सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या कोस्टल रोडच्या कामामुळेही समुद्राच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात आणि दर्जात मोठा बदल झाल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )

समुद्राला नवजीवन देण्यासाठी तातडीचे उपाय

मुंबईच्या या समुद्राला पूर्णपणे मृत होण्यापासून वाचवायचे असेल, तर आता केवळ चर्चा करून चालणार नाही, तर तातडीने कठोर उपाययोजना कराव्या लागतील. त्यामध्ये खालील गोष्टींचा प्राधान्याने समावेश करणे गरजेचे आहे.

समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर आणि मैल्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया केंद्र उभारूनच ते पाणी पुढे सोडले जावे. कचरा आणि प्लास्टिक समुद्रात वाहून जाऊ नये म्हणून सर्व मोठ्या नाल्यांच्या तोंडाशी विशेष जाळ्या बसवण्यात याव्यात. समुद्र आणि किनाऱ्यांची नियमितपणे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवणे आवश्यक आहे. 

समुद्राचे रक्षण करणाऱ्या कांदळवनांचे म्हणजेच मॅनग्रोव्हजचे संवर्धन आणि संरक्षण केले पाहिजे. याशिवाय सागरी प्रदूषण करणाऱ्या घटकांविरोधात अत्यंत कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी करावी लागेल आणि जहाजांवरील कचरा कुठेही समुद्रात टाकण्यावर पूर्णपणे बंदी घालावी लागेल.

मुंबईची शान असलेल्या मरीन ड्राईव्हचा क्वीन्स नेकलेस आणि येथील सौंदर्य टिकवून ठेवणे ही केवळ पालिकेची नाही, तर प्रत्येक मुंबईकराची जबाबदारी आहे. या समुद्राला साक्षी मानून लाखो लोक मुंबईत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. त्यामुळे जर आज प्रत्येक नागरिकाने आणि प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात मुंबईत एके काळी खूप सुंदर समुद्र होता, असे फक्त पुस्तकात वाचायची वेळ आपल्या पुढच्या पिढीवर येईल.
 

Topics mentioned in this article