- राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे
- राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल तैनात
- माथेरान, लोणावळा, खोपोली आणि लोहगड परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF आणि 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे. मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)पथके पुर्व तैनात करताना पालघर व नागपूर येथे प्रत्येकी 2 आणि पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व धाराशिव प्रत्येकी 1 पथके तैनात करण्यात आली आहे. मुंबई येथे 4 पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची एकूण 6 सज्ज आहेत. त्यात धुळे व नागपूर प्रत्येकी 2 आणि नांदेड, गडचिरोली पथके तैनात आहेत.
मुंबईतील सांताक्रूझ येथे 151.2 मिमी तर कुलाबा येथे 128 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय लोणावळा येथे 670 मिमी, अंबोना येथे 537 मिमी, ताम्हिणी येथे 580 मिमी, भिवपुरी येथे 266 मिमी, निलशी येथे 275 मिमी, मुळशी येथे 230 मिमी, माथेरान येथे 302 मिमी, कर्जत येथे 291.5 मिमी, पनवेल येथे 182.5 मिमी, जुहू विमानतळ येथे 325.0 मिमी आणि भाईंदर येथे 188.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. माथेरान, लोणावळा, खोपोली व लोहगड परिसरात पावसाची तीव्रता अत्यंत जास्त असल्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा व राष्टीय प्रतिसाद बल यांच्याशी सतत समन्वय साधून बचाव कार्य चालू आहेत.
SEOC मधून GEO-DSS प्रणाली चा वापर करून धोका आणि प्रवणतेचे सखोल विश्लेषण करून अलर्ट प्रसारित करण्यात येत आहेत. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळी असल्याने वाहतुक बंद करण्यात आली होती. खोपोली येथे पाणी साचल्याने जुना महामार्ग ही बंद होता. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे , मिसिंग लिंक रस्ता, दरड कोसळुन एक्सप्रेस-वे दोन्ही बाजूंची वाहतुक बंद झाली होती. मंकी हिल ते ठाकुरवाडी पर्यंत दरड कोसळल्या रेल्वे वाहतुक बंद होता. पुणे-मुंबई रेल्वे मार्ग ही बंद होता. रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी दरडी हटवण्याचे काम युध्दपातहीवर सुरू आहे. मावळ तालुक्यातील घोरावाडी येथे (तळेगाव दाभाडे) पुरामध्ये एक बस 25 नगरिकांसाहित अडकली होती, NDRF पथक पाठवून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
मावळ मधील पाटण येथे एक घर दरडी खाली दबले होते. त्यात 3 ते 4 नागरिक दबले असण्याची शक्यता आहे. तेथे NDRF टीम पाठविण्यात आली असून बचावय कार्य चालू आहे. मानखुर्द येथे झोपडपट्टीवर इमारत कोसळुन 6 जणांचा मुत्यु व 1 जखमी झाला होता. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्यावतीने ही माहिती दिली आहे. राज्यात कुठे कुठे आपत्कालीन घटना घडल्या याची माहिती त्यांनी कळवली आहे. शिवाय प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी राज्य आपत्कालीन विभाग सज्ज असल्याचं ही सांगण्यात आलं आहे. राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं आहे. लोकांनी घाबरून जावू नये असं आवाहन ही करण्यात आली आहे. शिवाय काही अडचण असल्यास संपर्क करण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.