RSS Chief Mohan Bhagwat : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 'टॅरिफ बॉम्ब'वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी अमेरिकेचे नाव न घेता सांगितले की, भारतावर टॅरिफ (कर) लावला गेला आहे, कारण त्यांना आपल्या वाढत्या प्रभावामुळे भीती वाटत आहे. ते म्हणाले की, "लोकांच्या मनात एक भीती असेल की दुसरा मोठा झाला तर माझे काय होईल? आपले स्थान कुठे राहील? म्हणून टॅरिफ लावा."
काय म्हणाले भागवत?
शुक्रवारी मोहन भागवत म्हणाले की, माणूस आणि देश आपला खरा स्वभाव ओळखत नाहीत, तोपर्यंत त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागेल. नागपूर येथील ब्रह्माकुमारीज विश्व शांती सरोवरच्या 7 व्या स्थापना दिनी बोलताना भागवत म्हणाले की, ब्रह्माकुमारीज सारख्या महिलांच्या नेतृत्वाखालील आध्यात्मिक चळवळीप्रमाणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आंतरिक चेतना जागृत करण्याचे काम करते. ते म्हणाले, "जोपर्यंत माणूस आणि देश आपली वास्तविकता समजून घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागेल. जर आपण दया दाखवली आणि भीतीवर मात केली, तर आपला कोणीही शत्रू राहणार नाही."
( नक्की वाचा : Mohan Bhagwat : 'हम दो, हमारे तीन'ची वेळ आली!लोकसंख्या धोरणावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचा नवा फॉर्म्युला )
"जगातल्या लोकांना भीती वाटते की, जर पुढचा मोठा झाला तर माझे काय होईल? भारत मोठा झाला तर आपले स्थान कुठे राहील? म्हणून टॅरिफ लावा. आम्ही तर काहीही केले नाही, ज्याने केले त्याला तुम्ही जवळ करत आहात, कारण तो सोबत राहिला तर भारतावर दबाव कायम राहील. असे का? तुम्ही 7 समुद्रापार राहता, कोणताही संबंध नाही. पण, भीती वाटते." असंही भागवत यांनी यावेळी सांगितलं.
आरएसएस प्रमुख म्हणाले की, माणसाने आपले 'मी' असलेले वर्तन 'आपण' मध्ये बदलले तर सर्व समस्या दूर होतील. ते म्हणाले, "'मी-माझे' याच्यामुळे हे सर्व झाले आहे. जेव्हा तुम्हाला समजेल की 'मी-माझे' नाही, तर 'आम्ही-आमचे' आहे, तेव्हा सर्व समस्या संपतील. जगाला आज उपाय (सोल्यूशन) पाहिजे."