KDMC Mahasabha Latest News : कल्याण-डोंबिवलीच्या महासभेत पुनर्वसन धोरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला."प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आमदारांनी महापालिकेच्या कामात इंटरफेअर करू नये.आमदारांनी त्यांच्या स्तरावरील कामे केली पाहिजेत.प्रत्येक रस्त्याच्या कामाला जाणे.छोटी छोटी कामे आम्ही केडीएमसीच्या स्तरावर पाहू शकतो. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत,” असे वक्तव्य विश्वनाथ राणे यांनी महासभेत केले.राणे यांच्या या वक्तव्याला राजेश मोरे यांना घरचा आहेर दिला,अशी चर्चा आहे. या वक्तव्यानंतर कल्याणच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
महासभेत पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमधील मतभेद समोर
या वादाची पार्श्वभूमी म्हणजे केडीएमसीचे भाजप नगरसेवक मंदार हळबे यांच्या प्रभागातील टंडन रोड परिसर.या ठिकाणी महापालिका काही घरांवर कारवाई करण्यासाठी गेली असता शिवसेना आमदार राजेश मोरे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाई थांबवली होती.यावर महासभेत मंदार हळबे यांनी पुनर्वसन धोरणावर प्रश्न उपस्थित करत,“महापालिकेची भूमिका एकच असली पाहिजे.
नक्की वाचा >> Mumbai News : पावसाळापूर्व तयारीचा DCM शिंदेनी घेतला आढावा, म्हणाले, "मुंबईतील 1700 किमीच्या रस्त्यांचे.."
आमदारासाठी एक नियम आणि सर्वसामान्यांसाठी दुसरा नियम,असे चालणार नाही,”अशी भूमिका मांडली.याच मुद्द्यावरून विश्वनाथ राणे यांनी आमदार राजेश मोरे यांच्यावर टीका करत महापालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला.त्यामुळे केडीएमसीच्या महासभेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील राजकीय मतभेद समोर आले आहेत.
कल्याण डोंबिवलीत पुनर्वसन संदर्भात नवे धोरण राबवले पाहिजे, अशी भूमिका केडीएमसी महासभेत शिवसेना गट नेते विश्वनाथ राणे यांनी घेतली आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सत्तेत एकत्र असताना दोघांमध्ये वाद होत असतात. मात्र पुनर्वसनाच्या मुद्द्यावर भाजप नगरसेवक मंदार हलवे यांनी जी भूमिका मांडली, त्याचं शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांनी समर्थन केलं. या सर्व प्रकरणावर आता शिवसेना आमदार राजेश मोरे यांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.