Chhatrarpati Sambhajinagar : दहावीच्या परीक्षेत मित्रापेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीतील वारेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सोहम प्रमोद बोरसे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वारेगावचा सोहम बोरसे हा फुलंब्री शहरातील संत सावता गुरुकुल विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. मंगळवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात त्याला 70 टक्के गुण मिळाले. मात्र त्याच्या जवळच्या मित्राला त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. त्यामुळे तो नैराश्यात गेला. आईवडील बाहेर गेले होते, घरात कोणीच नव्हते. त्यावेळी नैराश्यात गेलेल्या सोहमने घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
(नक्की वाचा - SSC Result Maharashtra Board : दहावीचा निकाल लागला, 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींचीच बाजी!)
राज्यातील 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
(नक्की वाचा- राज्यातील 49 शाळा 'ढ', दहावीचे सर्व विद्यार्थी नापास; मुंबई-पुण्यातील शाळांचाही समावेश)
त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 टक्के आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.82 टक्के असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 90.78 टक्के आहे. राज्यातील 7924 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.