काळ आला होता पण वेळ आली नव्हती! 'त्यांनी' सांगितला अंगावर काटा आणणारा थरार

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असचं काहीसं इक्बाल यांच्याबरोबर घडलं. त्यावेळचा अंगावर काटा आणणारा थरारच त्यांनी आपल्या शब्दात एनडीटीव्ही मराठीला सांगितला.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

जुई जाधव 

घाटकोपरच्या छेडा नगरातील पेट्रोल पंपावर भलं मोठं होर्डिंग कोसळलं. त्यानंतर तिथे एकच धावपळ झाली. काहींना त्यात आपला जीवही गमवावा लागला. काही जण जबर जखमी झाले. तर काही जण नशिबवान निघाले, जे या दुर्घटनेत सुखरूप बाहेर आले. त्यापैकीत एक आहेत टॅक्सीचालक इक्बाल शेख... काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असचं काहीसं इक्बाल यांच्याबरोबर घडलं. त्यावेळचा अंगावर काटा आणणारा थरारच त्यांनी आपल्या शब्दात एनडीटीव्ही मराठीला सांगितला.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर त्यावेळी काय झालं याची हकिगत इक्बाल शेख यांनी सांगितली. इक्बाल हे टॅक्सी चालक आहेत. तेही नेहमी प्रमाणे गॅस भरण्यासाठी घाटकोपरच्या पंपावर होते. त्यांनी सांगितले की, " सुरुवातीला धुळीचे वादळ आले. ते थांबत नाही तोच पावसाला सुरुवात झाली. धुळीचे वादळ सुरू झाल्यानंतर, आम्ही काचा लावून गाडीतच बसलो होतो. पावसासोबतच सोसाट्याचा वाराही होता. त्याच वेळी एक मोठा आवाज झाला. काही कळायच्या आत माझ्या गाडीवर होर्डिंग कोसळले. सर्वत्र एकच गोंधळ उडाला. त्यावेळी सीएनजीसाठी 35-40 गाड्या रांगेत उभ्या होत्या. त्यातल्या एकालाही पळण्याची संधीच मिळाली नाही. मात्र इक्बाल हे गाडीची काच फोडून कसेबसे बाहेर पडले. प्रचंड भीतीचं वातावरण तिथे होते. तिथे किंकाळ्या आणि आरडाओरड होत होती. अनेक जण मदतीची याचना करत होते. काही जण त्या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. कोणी तरी मदत करावी यासाठी ते याचना करत होते. त्यात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरूच होता.  

Advertisement

हेही वाचा - रिक्षाचा चुराडा, मोबाइल सापडला, पण 12 तासानंतरही 'तो' बेपत्ता

पावसामुळे आडोशाला उभे असलेले बाईकवालेही आत अडकले होते. "या पेट्रोल पंपावर इतर पंपांप्रमाणे सीएनजी आणि पेट्रोल, डिझेलसाठीची रांग वेगळी होती. पेट्रोल आणि डिझेलच्या रांगेत बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. होर्डिंगच्या खाली यातल्या गाड्या प्रामुख्याने अडकल्या होत्या असं इक्बाल शेख यांनी सांगितले आहे.  गाडीमध्ये अडकलेल्यांचे काय झाले हे काहीच कळू शकले नाही. या गाड्यांमध्ये असलेल्यांना बाहेर पडण्याची काहीच संधी नव्हती. ज्यामुळे मृतांचा आकडा आणखी जास्त असू शकतो अशी भीती इक्बाल यांनी व्यक्त केली आहे. 

Advertisement

हेही वाचा - होर्डिंगच्या मालकामुळे 14 जणांचे हकनाक बळी; नववी फेल असलेला भावेश भिंडे कोण आहे? 

इक्बाल हे या घटनेनंतर तिथेच होते. थोडावेळांनी त्यांनी आपली गाडी शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना गाडी शोधण्यात यश आले नाही. ते मंगळवारी पुन्हा तिथे पोहचले. गाडी शोधायचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांनी तिथून हटकले आणि दूर जाण्यास सांगितल्याचे इक्बाल सांगतात. 

Advertisement

या दुर्घटनेत त्यांच्या टॅक्सीचा चेंदामेंदा झाला. चेंदामेंदा झालेली गाडी आपलीच आहे का हेही त्यांना माहित नाही. या गाडीवरच इक्बाल यांचे पोट होते. आता पोट कसं भरायचं असा प्रश्न त्यांच्या  समोर आहे. आपल्याला कोण मदत करणार, नुकसान भरपाई कोण देणार या सर्व प्रश्नांनी त्यांना घेरलं आहे. एक संकट गेलं आणि आता दुसरं संकट समोर उभं ठाकलं आहे. त्यातून कसा मार्ग काढायचा या विवंचनेत ते आहेत.