- टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोलंबोतील हाय-व्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट
- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने मैदानावर पाऊस पडावा अशी आशा व्यक्त केली
- नियमांनुसार, किमान पाच षटकं खेळले गेले तरच सामना वैध मानला जाईल, अन्यथा सामना रद्द होईल
India vs Pakistan T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषका मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आज हा सामना रंगणार आहे, मात्र श्रीलंकेच्या हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वर्ल्डकपमधील हा हाय होल्टेज सामना आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. त्यात जर पाऊस पडला तर पुढचं गणीत काय असेल ते ही आपण जाणून घेवूयात.
एका टीव्ही शोमध्ये बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने चक्क "मैदानावर पाऊस पडावा" अशी प्रार्थना केली. क्रिकेट चाहत्यांना पूर्ण सामना पाहण्याची ओढ लागलेली असताना, माजी क्रिकेटपटूने पावसाची मागणी केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पाकिस्तानची सध्याची स्थिती पाहता, गुण गमावण्यापेक्षा एक गुण पदरात पाडून घेणे सुरक्षित असल्याचे बासितला वाटत असल्याची चर्चा आहे. शिवाय वर्ल्डकपमध्ये भारताला पाकिस्तान पराभूत करू शकलेला नाही हा इतिहास आहे.
नक्की वाचा - IND vs PAK: 'तो' 10 ओव्हर खेळला तर सामना संपलाच समजा' 'या' खेळाडूची शोएब अख्तरलाही धडकी
नियमांनुसार, सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळणे आवश्यक आहे. पाऊस न थांबल्यास सामना रद्द केला जाईल. ग्रुप स्टेजमध्ये 'रिझर्व्ह डे'ची तरतूद नसल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल. सध्या दोन्ही संघांचे गुण समान असले तरी नेट रनरेटमध्ये भारत सरस आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांचा पुढील फेरीचा मार्ग सोपा होऊ शकतो.
श्रीलंका हवामान विभागाने आज दिवसभर गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. संध्याकाळीही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बासित अली म्हणाला की, "माझी दुआ आहे की पाऊस पडू दे." त्याच्या या विधानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, पाकिस्तानला भारताच्या पराभवाची भीती वाटतेय का? असे प्रश्न चाहते विचारत आहेत. जर आज पाऊस पडला आणि सामना झाला नाही, तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 1 गुण जमा होईल.