अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 चा क्वालिफायर-2 पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. हा सामना जवळपास दोन तास उशिरा सुरू झाला. कारण नाणेफेकीनंतर लगेचच पावसाने हजेरी लावली होती. दोन तास पाऊस होता. त्यानंतर रात्री पावणे दहा वाजता सामना सुरू झाला. अहमदाबादला पाऊस होईल अशी कोणतीही शक्यता वर्तवण्यात आली नव्हती. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे एकच धावपळ उडाली. त्यात क्वालिफायर-2 साठी कोणताही राखीव दिवस (Reserve Day) नव्हता. मात्र, एकदा सामना सुरू झाल्यावर पावसाने पुन्हा अडथळा आणला नाही. शेवटी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स, दोन्ही संघ पहिल्या हंगामापासून लीगचा भाग आहेत. शिवाय दोन्ही संघ आपल्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या हंगामात नवीन विजेता मिळणे निश्चित आहे. पण फायनल मॅच वेळी ही अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा मात्र हिरमोड होऊ शकतो.
फायनलच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी शहरात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत तापमान कमी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. सकळा तापमान 38 अंश सेल्सिअस असेल संध्याकाळी ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येवू शकते. Accuweather नुसार, दिवसा एक तास पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, संध्याकाळच्या वेळीही पाऊस पडू शकतो.
जर सामना रद्द झाला, तर काय होईल?
नॉक-आउटमधील इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्यासाठीही 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. परंतु, जर 3 जून रोजी पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर 4 जून रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या दिवशी सामन्याचा निकाल येऊ शकतो. पण सामना जर पावसामुळे रद्द झाला तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. पण जर दोन्ही दिवशी पावसामुळे सामन्याचा निकाल येऊ शकला नाही, तर पंजाब किंग्सला चॅम्पियन म्हणून घोषीत केले जाईल. त्यांना आयपीएल 2025 ची ट्रॉफी मिळेल. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे ते गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुपेक्षा वर होते.