पोलीस भरतीसाठी पहाटे धावत होती, नराधमांनी डाव साधला; 6 जणांकडून विनयभंग 

ही 17 वर्षांची मुलगी पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहाटे धावण्याचा सराव करीत होती.

Advertisement
Read Time: 2 mins
जालना:

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय तरूणीवर चाकुने हल्ला चढवत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील निकळक येथील वाल्हा शिवारात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरूद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत रात्री उशीरा गुन्हा दाखल केला होता. (Crime News)

मात्र यानंतर तरुणीला आरोपींनी धमकी दिली. सर्व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने या मुलीवर तिच्या राहत्या घरातून उपचार सुरू आहे. याबाबतची माहिती मिळताच मनोज जरांगे  पाटील आणि बदनापूरचे आमदार नारायन कुचे यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत 6 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जरांगे यांनी फोन वरून तर आमदार नारायण कुचे यांनी त्या मुलीची भेट घेऊन तिला धीर दिला आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून पोलीस उपअधीक्षक निपाणी यांच्या सह विभागीय पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा शोध सुरु केलाय. पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या मुलीवर हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीला तत्काळ अटक करावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात आहे. ही घटना 12 सप्टेंबर रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली असून यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला जबर मारहाण झाल्याच उघड झालं आहे.  

नक्की वाचा -Nagpur Hit and Run प्रकरणाला नवं वळण, CCTV फुटेजनंतर पोलिसांचे 2 मोठे खुलासे

त्या दिवशी नेमकं काय घडलं?
12 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास 17 वर्षीय मुलगी वाल्हा रोडवर रनिंग करीत असताना 3 मोटारसायकलवर आलेल्या सहा अज्ञातांनी या तरुणीचा हात ओढून तिला खेचत नेत तिच्या पोटावर, हातावर, पायावर चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. इकडे परत आली तर तुला आणि तुझ्या वडिलांना जीवे मारू अशी धमकी सुद्धा दिली. या तरुणीच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा करण्यात आला असून आरोपीच्या गुन्हात वाढ करून खुनाचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींना तत्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.