- जळगावमध्ये एका 20 वर्षीय बांगलादेशी तरुणीने लग्नासाठी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता
- कोणीका राणी या तरुणीने चिन्मय वाला नावाच्या जळगावातील सुवर्ण कारागीराशी सोशल मीडियावरून प्रेम केले होते
- शनिपेठ पोलिसांनी अवैध राहणीसाठी कोणीका राणी आणि चिन्मय वालाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे
मंगेश जोशी
प्रेम हे आंधळं असतं. मग त्याच्यासाठी काही ही करण्याची तयारी प्रेमी युगुलांची असते. असाच एक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. सोशल मीडियावरून एका 20 वर्षीय बांगलादेशी तरुणीची जळगावमध्यला एका तरुणा सोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. अशा स्थितीत या बांगलादेशी तरुणीने लग्नासाठी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. भारतात आल्यानंतर तिने आपला प्रियकर राहात असलेलं जळगाव गाठलं. कोणीका राणी शामलचंद्र राय असे या तरुणीचे नाव आहे. शनिपेठ पोलिसांनी तिला आणि तिला आश्रय देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. शिवाय शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नासाठी ओलांडली सीमा
जळगाव शहरातील जोशी पेठ भागात एक परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, कोणीका राणी ही तरुणी आढळून आली. चौकशीदरम्यान तिच्याकडे कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले. जळगावातील सुवर्ण कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला याच्याशी तिची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने थेट बांगलादेशची सीमा ओलांडून जळगाव गाठले. तिला या तरुणासोबत लग्न करायचे होते. ते दोघे ही एकत्र राहात होते. पण तिने भारतात येण्याचा चुकीचा मार्ग निवडला. शेवटी ती वाईट पद्धतीने फसली.
दोघांवरही गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी कोणीका राणी आणि चिन्मय वाला या दोघांविरुद्ध इमिग्रेशन व परदेशी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपण विवाह केल्याचा दावा या दोघांनी केला असला, तरी त्याबाबतचा कोणताही कायदेशीर पुरावा पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जळगावचा सुवर्ण कारागीर चिन्मय आणि बांगलादेशची कोणीका यांची ओळख सोशल मीडियावरून झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि लग्नासाठी कोणीका हिने थेट भारतात येण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तिने छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता. ती जळगावातील जोशी पेठ परिसरात चिन्मयसोबत राहू लागली.
विवाहाचा दावा फोल?
याबाबतची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी अवैध पद्धतीने राहात आहेत. त्यांच्या विरोधात मोहिम हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे जळगाव पोलीसांनी माहिती मिळताच छापा टाकला. त्यात ही बांगलादेशी तरुणी हाती लागली. दरम्यान चिन्मय आणि कोणीका यांनी आपण लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, त्यांच्याकडे विवाहाचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाहीत. बेकायदेशीर घुसखोरी केल्याप्रकरणी आता या प्रेमी युगुलाला पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे. प्रेमासाठी तिने सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला.