BJP Leader Death: दोन सख्या बहिणींसोबत लग्न आणि शॉपिंगवरून सुरू झालेला घरगुती वाद भाजपाच्या बड्या नेत्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्या जबाबदाऱ्या आणि दोन पत्नींमधील सवती मत्सर यातून एका दिग्गज नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा मृत्यू नैसर्गिक आहे की त्याची हत्या करण्यात आली, याबाबत आता गूढ निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
हा संपूर्ण प्रकार झारखंडमधील धनबाद येथे घडला आहे. भाजप एससी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अमृत दास यांचा मृतदेह शुक्रवारी 1 मे रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. अमृत दास यांनी दोन सख्या बहिणींसोबत लग्न केले होते. मात्र या दोन्ही पत्नींमध्ये वारंवार खटके उडत असत.
मृत्यूच्या आदल्या दिवशी अमृत दास हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शॉपिंगसाठी बाजारात घेऊन गेले होते. ही गोष्ट पहिल्या पत्नीला समजताच घरात मोठा राडा झाला. दोन्ही बहिणींमध्ये झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर पुढे मोठ्या शोकांतिकेत झाले.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
मृत्यूचे गूढ कायम
गोविंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. अमृत दास यांचा मृत्यू नक्की कसा झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून घरातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस सध्या दोन्ही पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी करत आहेत.
घरच्यांचा गंभीर आरोप
अमृत दास यांच्या आईने आणि बहिणीने या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. दोन्ही पत्नींमधील वादामुळेच अमृत यांची हत्या करण्यात आली असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. दोन पत्नींमध्ये नेहमीच तणाव असायचा आणि शॉपिंगच्या वादातून हा तणाव पराकोटीला पोहोचला होता, असेही कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून नियोजनबद्ध केलेली हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात चिमुरडीवर अत्याचार करुन जीव घेणारा तो नराधम निघाला सराईत वासनांध; सख्खी पुतणीही होती शिकार )
गोविंदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विष्णू प्रसाद रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच अमृत दास यांचा मृत्यू गळा आवळून झाला, विषबाधेने झाला की अन्य काही कारणाने, हे स्पष्ट होईल. एका भाजपा नेत्याचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळातही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.