Ambernath News : सरकारी रुग्णवाहिका उपमुख्यमंत्र्यांच्या सेवेत; महिला रुग्णाच्या मृत्यूने कुटुंबाचा आक्रोश

वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला.

जाहिरात
Read Time: 1 min

अमजद खान, प्रतिनिधी

Ambernath News : अंबरनाथमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंबरनाथमधील स्वामी नगरमध्ये राहणाऱ्या मीना बलराम सुर्यवंशी यांचा मृत्यू रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पाठवण्यात आली होती.

19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मीनाबाई सुर्यवंशी यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे तातडीने उपचारासाठी अंबरनाथ येथील छाया उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर उपचार मिळाले नाहीत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती पाहून त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, जेव्हा सूर्यवंशी यांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडून रुग्णवाहिकेची मागणी केली, तेव्हा रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. आणि ती रुग्णवाहिका उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं. 

नक्की वाचा - Pune News: 20 मजूरांसह 12 लहान मुलांना ठेवलं नजर कैदेत, वीट भट्टी मालकाचं हे अघोरी कृत्य का केलं?

Advertisement

पर्यायी वाहन शोधण्याचा प्रयत्न केला गेला. पण तेवढ्यात मौल्यवान वेळ निघून गेला. दुर्दैवाने, मीनाबाई सुर्यवंशी यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याआधीच मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका बाजुला राजकीय कार्यक्रमासाठी सरकारी रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरण्यात येते, तर दुसरीकडे एक गंभीर रुग्ण तिच्या जीवासाठी झुंज देत असताना मृत्यू झाला .