Malad Hit and Run Case: मुंबईतील मालाड परिसरातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. लग्नाच्या 20 वर्षानंतर ज्या घरामध्ये पाळणा हलला, त्या घरातील एकुलता एक दिवा एका बेजबाबदार कार चालकाच्या वेगामुळे कायमचा विझला आहे. निलयोग विराट बिल्डिंगमध्ये घडलेल्या या हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
कसा झाला अपघात?
'आज तक' नं मालाड पूर्व येथील निलयोग विराट बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सिंह परिवारामध्ये सध्या लग्नाची लगबग होती. घरामध्ये आनंदाचे वातावरण असतानाच 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 च्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. जयप्रकाश सिंह यांचा 4 वर्षांचा मुलगा लक्ष बिल्डिंगच्या खाली खेळत होता. त्याच वेळी एका भरधाव काळ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा कारने लक्षला जोराची धडक दिली आणि त्याला चिरडले.
या घटनेतील आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे, लग्नाच्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लक्षचा जन्म झाला होता. तो कुटुंबाचा एकुलता एक आधार होता, जो आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
(नक्की वाचा : VIDEO : हे पाहताना श्वास रोखून धराल! मृत्यू काही इंचावर असताना तरुणाला मिळाला पुनर्जन्म )
सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण अपघात
या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये अपघाताचा थरार स्पष्ट दिसत आहे. लक्षला चिरडल्यानंतर कार ड्रायव्हरनं कार थांबवली आणि तिथल्या वॉचमनला याबद्दल माहिती दिली. व्हिडिओमध्ये वॉचमन त्या चिमुकल्याला उचलून नेताना दिसत आहे.
मात्र, लक्षला मदत करण्याऐवजी किंवा त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपी चालक रमेश देवजी जतरारा तिथून फरार झाला. मुलाला वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, असा टाहो त्याच्या वडिलांनी फोडला आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्ब? 50 कोटींचा विमा आणि... आजवरचा सर्वात मोठा आरोप )
या घटनेनंतर दिंडोशी पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहता आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी ढिलाई दाखवली, असा आरोप सिंह परिवाराने केला आहे. कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाब विचारला, तेव्हा कुठे आरोपीचा जामीन रोखण्यात आला.
आरोपी रमेश हा त्या सोसायटीचा रहिवासी नसून तो फक्त तिथे कार पार्किंगसाठी येत असे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.