मेघालया: लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम.. लग्नानंतर वधू-वर सुखी संसाराची, नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत असतात. मात्र मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या एका नवविवाहीत जोडप्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. इंदोरमधून मेघालयातील शिलाँगमध्ये हनीमूनला गेलेल्या जोडप्यापैकी पतीचा मृतदेह आढळला असून पत्नी बेपत्ता आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर..
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मेघालयातील शिलाँगमध्ये 11 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंदूर येथील नवविवाहित जोडप्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती राज रघुवंशीचा मृतदेह सापडला असून पत्नी सोनमबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी शोक व्यक्त केला आहे.
नवविवाहित जोडपे राज रघुवंशी आणि सोनम रघुवंशी 20 मे रोजी त्यांचा हनिमून साजरा करण्यासाठी गुवाहाटी येथे गेले होते. तेथून ते फिरायला शिलाँगमधील ओसारा हिल्सवर पोहोचले. त्यानंतर 23 तारखेपासून कुटुंबातील सदस्यांचा दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही. 24 मे रोजी कुटुंबाने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर इंदूर पोलिसांनी शिलाँग पोलिसांशी संपर्क साधला आणि दोघांचा शोध सुरू केला.
अशातच तब्बल 11 दिवसानंतर राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला आहे. राजाचे नाव त्याच्या गोंदलेले होते. मृतदेह सापडल्यानंतर राजाचा भाऊ सचिन याने त्याची ओळख पटवली. राजाच्या पत्नीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून तिचा शोध सुरु आहे. दोघेही बेपत्ता झाल्यानंतर प्रथम त्यांची स्कूटी सापडली होती. त्या स्कूटीपासून 25 किमी अंतरावर डोंगराच्या खाली राजाचा मृतदेह सापडला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही राजा रघुवंशी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, लग्नानंतर मेघालयला भेट देण्यासाठी गेलेल्या इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचे आणि नंतर त्यांचा मृतदेह सापडल्याचे वृत्त खूप दुःखद आहे. त्यांची पत्नी सोनमचा शोध सुरू आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की तो मृतांच्या आत्म्याला शांती देवो..