JNPT कडे जाणारा 16 लाखांचा माल लंपास, 3 महिन्यांपासून सुरु होता प्रकार! प्रकरण काय?

पनवेलमधील अजिवली गावातून जेएनपीटी पोर्टकडे माल वाहतूक करताना ट्रक चालकांनीच माल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

पनवेलमधील अजिवली गावातून जेएनपीटी पोर्टकडे माल वाहतूक करताना ट्रक चालकांनीच माल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी पाच ट्रक चालकांविरोधात फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी भादंवि (बीएनएस) कलम 316(3) (विश्वासघात) आणि 318(4) (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती उरण पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिली.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील फिर्याद  पनवेल तालुक्यातील अजिवली गावात माल वाहतूक व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीच्या मालकाने दिली असून, आरोपींनी नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत ही माल लंपास करण्याची मालधाडी केली होती. मात्र, ही बाब उघडकीस येताच संबंधित कंपनीने 23 जून 2025 रोजी तक्रार दाखल केली आणि त्यानंतर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

(नक्की वाचा : Dombivli : 65 बेकायदा इमारत प्रकरणी काय तपास केला? उच्च न्यायालयाची ED ला विचारणा )

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालकांनी अजिवली येथील गोदामातून जेएनपीटी पोर्टकडे जाताना कंटेनर ट्रेलरमधील जीपीएस प्रणाली बंद केली आणि मार्गामध्येच माल चोरून त्याचा अपहार केला. त्यानंतर पोर्टच्या दिशेने पुढे जाऊन पोहोचण्याआधी पुन्हा जीपीएस सुरू केला आणि उरलेला माल पोर्टवर पोहोचवला.

पोर्टवर पोहचल्यानंतर झालेल्या तपासणीत मालात तफावत आढळून आली आणि यावरून कंपनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आरोपींनी चोरून नेलेला माल हा लाल मिरची, काबुली चणा आणि तांदूळ असा होता, जो जेएनपीटी पोर्टमार्फत निर्यातीसाठी पाठवण्यात येत होता.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1. प्रताप रोशन सिंग
2. सतीश सतेंद्र पटेल
3. राम सागर रामदखन यादव
4. बिरेंद्र खन्यालाल
5. राजेश कुमार करनसिंग

सर्व आरोपी हे ट्रक चालक असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलीस अधिक तपास करत आहेत आणि लवकरच कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्यातील एकूण लंपास करण्यात आलेल्या मालाची किंमत 16 लाख 2 हजार 675 रुपये असून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास गतीने सुरू केल्याची माहिती आहे.

Advertisement

नवी मुंबई पोलिसांन तपास सुरूच; ट्रक चालकांच्या संगनमताचा संशय

पोलीस तपासात हे उघड होत आहे की मालवाहतूक करणाऱ्या पाचही ट्रक चालकांनी संगनमत करून GPS बंद करत माल लंपास केला. हे एक पूर्वनियोजित कट कारस्थान असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. GPS प्रणाली बंद केल्यामुळे ट्रकचे लोकेशन ट्रॅक करता येत नव्हते, ही बाब गंभीर असून कंपन्यांनी भविष्यात अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याची सूचना पोलिसांनी दिली.