- धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांनी भिगवण प्रकरणातील खरा सूत्रधार शोधण्याची मागणी केली आहे
- हाके यांनी भिगवण पोलिसांना भेट देऊन प्रतिज्ञापत्र कसे बनवले आणि खोटे शिक्के वापरले याचा तपास करा अशी मागणी
- त्यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर ही गंभीर आरोप केले आहेत
देवा राखुंडे
भिगवण प्रकरणामागील खरा सूत्रधार शोधा अशी मागणी धनगर समाजाचे नेते घनश्याम हाकेंनी केली आहे. यावेळी त्यांनी भिगवण पोलिसांची भेट देवून याबाबत निवेदन दिले. खोटे शिक्के वापरून सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं असा सवाल ही यावेळी हाके यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर ही हल्लाबोल केला. त्या मुलीचा व्हिडिओ कोणी बनवला? तो पोलिसांपर्यंत कोणी पाठवला? याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
तरुणीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कोणी बनवले? त्यावर खोट्या शिक्क्यांचा वापर केला आणि या सर्वांना पाठीशी घालणारा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास करण्यात यावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. हाके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. हाके यांनी संबंधीत मुलीच्या आईची भेट घेतली. आईचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मुलीला पळवून नेल आहे. एका बाजूने हा तपास होत आहे. तर दुसऱ्या बाजूला मुलीच्या नातेवाईकांचा जबाब घेतला जात नाही असा आरोप ही त्यांनी केला.
ज्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण झालं त्या दिवशी ज्या मुलासोबत तिचं लग्न ठरलं होतं, त्या मुलाला तिने नथ घेत असतानाचा एक फोटो पाठवला होता. अशी माहिती यावेळी हाके यांनी दिली. म्हणजे ती होणाऱ्या नवऱ्या सोबत तोपर्यंत बोलत होती. यानंतर त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. यात पूर्णपणे तिचं धर्मांतर करण्यात आले आहे. या प्रकरणाला प्रेम प्रकरण म्हणलं जात आहे. यात जात आणि धर्म कुठे आला असा प्रश्न काही जण विचारत आहेत. ते लोक अकलेचे तारे तोडत आहेत अशी टिका हाके यांनी केली.
नक्की वाचा - Trending News: 5 दिवसात 4 राज्य फिरला, ब्रिटीश युट्यूबर भारताबाबत थेट बोलला, म्हणाला खरा चेहरा...
त्या मुलीला हिजाब घालून तिची टिकली काढून तिचा व्हिडिओ बनवला जात आहे. त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी दबावापोटी बोलत आहे असा दावा ही हाके यांनी केला. ती मुलगी सांगते नऊ वर्षापासून आमचे प्रेम संबंध आहेत. असं असेल तर ती सातवीत असताना प्रेम करत होती का? त्या वयात प्रेम वैगरे समजत का असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणात तिच्यावर दबाव टाकला जात आहे. तिला धमकावलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. तिला ब्लॅकमेल केले जात आहे असं ही ते म्हणाले.