इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) यांनी 11 मे 2025 रोजी मोठ्या थाटामाटात सोनमशी (Sonam Raghuvanshi) लग्न केले होते. 'एकत्र जगू आणि मरू' अशा आणाभाका घेतल्यानंतर, अवघ्या 12 दिवसांनी सोनमच त्याच्या हत्येची सुपारी देईल,याची त्याला कल्पनाही नव्हती. मेघालयमध्ये हनीमून साजरा करण्यासाठी गेलेल्या राजाची 23 मे रोजी जंगलात हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप थेट त्याची पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांच्यावर आहे. घटनेच्या 17 दिवसांनंतर, 8 आणि 9 जूनच्या मध्यरात्री तिने गाझीपूरमध्ये येऊन आत्मसमर्पण केले. मात्र, सोनमच्या आत्मसमर्पणाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोनम कुठे होती?
हत्या आणि आत्मसमर्पणादरम्यानचे 17 दिवस सोनम कुठे गायब होती? याचा पोलीस शोध घेत आहेत. या काळात तिने काय-काय केले आणि ती कुठे-कुठे गेली, तसेच ती मेघालयपासून इतक्या दूर उत्तर प्रदेशमधील गाझीपूरला आत्मसमर्पणासाठी कशी पोहोचली, याचाही पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्यानंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण मेघालय आणि मध्य प्रदेश पोलिसांनी केलेल्या छापेमारीत राज कुशवाह पोलिसांच्या हाती लागला. त्यावेळी सोनम गाझीपूर आणि गोरखपूरमार्गे नेपाळला पळून जाण्यासाठी निघाली होती. पण राज कुशवाह पकडला गेल्यानंतर ती खचली. तिला वाटले की आता तीही वाचू शकत नाही, त्यामुळे तिने ड्रग्ज दिल्याची खोटी कहाणी रचली. त्यानंतर गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
( नक्की वाचा : Raja Raghuvanshi Murder : सोनमनं थकल्याचं नाटक केलं, हळू चालत होती, आणि एकदम ओरडली, 'त्याला मारा' )
मेघालयहून परतल्यानंतर सोनमनं काय केलं?
इतकंच नाही, तर आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे की, सोनम शिलाँगहून थेट उत्तर प्रदेशमधील गाझीपूरला आली नव्हती. तर, २३ मे रोजी ती गुवाहाटीहून इंदूरसाठी निघाली होती आणि 25 मे रोजी इंदूरला पोहोचली. येथे ती आपल्या सासरी किंवा माहेरी न जाता, तिचा प्रियकर राज कुशवाहला भेटली.
राजने तिला त्या दिवशी इंदूरमध्येच एका भाड्याच्या घरात थांबवले आणि दुसऱ्या दिवशी तिला कारने उत्तर प्रदेशसाठी रवाना केले. जिथे ती वेगवेगळ्या ठिकाणी राहिली. पण चारही बाजूंनी पोलिसांनी नाकेबंदी केल्यानंतर तिला अखेर आत्मसमर्पण करावेच लागले. सोनमनेही पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. ती वाराणसीहून गाझीपूरला पोहोचली आणि स्वतःला ड्रग्ज दिल्या गेल्याची आणि इतर गोष्टींची खोटी कहाणी रचली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशीच्या लग्नानंतर लगेचच त्याला संपवण्याचा कट तयार झाला होता. हा कट दुसऱ्या कोणी नाही, तर त्याची नवविवाहित पत्नी सोनमनेच राज कुशवाहसोबत मिळून रचला होता. या कटांतर्गत हे जोडपे शिलाँगला पोहोचले होते. 21 मे रोजी शिलाँगला पोहोचल्यानंतर या जोडप्याने 22 मे रोजी चेरापुंजीला जाऊन एक होमस्टे घेतला. या जोडप्यासोबतच हत्याकांडात सहभागी असलेले इतर आरोपींनीही तिथे होमस्टे घेतला. पण, याची राजा रघुवंशीला अजिबात कल्पना नव्हती.
भाड्याच्या गुंडांकडून राजाची हत्या
मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आरोपींनी राजाला पकडले. विक्की नावाच्या एका आरोपीने त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. राजाला ठार मारल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले. पण, हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर सोनम इंदूरला पोहोचली, जिथे तिने राज कुशवाहशी संपर्क साधला. त्यानंतर सोनम उत्तर प्रदेशला पोहोचली.
सोनमने हनीमूनदरम्यानचे कोणतेही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले नव्हते, ज्यामुळे कोणालाही संशय येऊ नये. पण, घटनास्थळावरून मिळालेल्या मारेकरी आकाशच्या जॅकेटने तपास सोपा केला. खरे तर, हे जॅकेट सोनमनेच आकाशला दिले होती, ज्यावर रक्ताचे डागही सापडले. राजावर आरोपी विशालने पहिला वार केला होता. यानंतर इतर आरोपींनी हल्ला केला.
सोनम सध्या कुठे आहे?
सोनम सध्या मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहे. तिला कडेकोट बंदोबस्तात पटना विमानतळावरून गुवाहाटीला नेण्यात आले आहे. गुवाहाटीहून तिला रस्त्याने शिलाँगला नेले जाईल. मेघालय पोलिसांनी पुढील चौकशी आणि तपासासाठी सोनमची पाच दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळवली आहे.