शरद सातपुते, सांगली:
Sangli Marriage Fraud: लग्नाच्या पहिल्या दिवशीच वधू आणि पाठराखणीने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या तासगाव तालुक्यात घडला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वराला अडीच लाखांचा गंडा घालण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परभणीमधील वधुसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाच्या नावाखाली फसवणूक..
लग्न करून लग्नाच्या पहिल्या दिवशीच मध्यरात्री वधू आणि तिच्या पाठराखीणीने वराला अडीच लाखांचा गंडा घालून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या सोमनाथ चव्हाण या वराने वधुसह पाच जणांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वधू निकिता सखाराम गोळे, तिची आई शोभा सखाराम गोळे, वधूची मानलेली बहीण पूजा विजय माने, वधूची मावशी आणि परभणी येथील वधुवर सुचक केंद्राचे माणिकराव रंगनाथ पारधे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर सोमनाथ चव्हाण यांचे भाऊ परभणी येथे ऊसतोड मजूर आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची वधुवर सुचक केंद्राचे माणिकराव पारधे यांच्यासोबत ओळख झाली. त्यावेळी त्यांनी सोमनाथ यांच्या भावाला सोमनाथ साठी निकिताचे स्थळ सुचवले. त्यानुसार वधुसह सर्वजण 4 सप्टेंबर रोजी लग्नाची बोलणी करण्यासाठी तासगाव मधील ढवळी येथे आले. लग्नाची बोलणी झाली.
नवरी अन् पाठराखीण फरार
यावेळी निकिताची आई शोभा हिने लग्नासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. परंतु तडजोडी अंती अडीच लाख रुपये देऊन 5 सप्टेंबर रोजी लग्न करण्यात आले. लग्नादिवशी दुपारी वधू व तिची पाठराखीण सोमनाथ याच्या घरी थांबले व उर्वरित सर्वजण परभणीला परतले. तर त्याच दिवशी मध्यरात्री वधू आणि तिच्या पाठराखीणीने घरातून पलायन केले. तीन महिने लोटले तरी निकिता घरी परत न आल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमनाथ याने आता तासगाव पोलिसात तक्रार दिली आहे.
Akola News: शिक्षकाच्या लाचखोरीचा भांडाफोड! 'उंच उडी'ची चर्चा अन् ACB ची कारवाई, पण न्यायालयात...
दरम्यान लग्नाच्या आमिषाने सांगली जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकार सुरूच असून आटपाडी तालुक्यातील दोन कुटुंबांना यापूर्वी पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. आता तासगाव मधील फसवणुकीचा प्रकार समोर आल्यामुळे लग्नाच्या आमिषाने सांगली जिल्ह्यात फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे.