- उज्जैनमध्ये एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ग्रूमिंग पद्धतीने प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले
- आरोपीने मुलीला ६ महिन्यांपासून पाळत ठेवून धर्मांतर आणि दुसऱ्या युवकाकडे सोपवण्याचा प्रयत्न केला
- पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मुलीला इंदूरमधील एका घरातून सुरक्षित बाहेर काढले
लव्ह जिहादची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. या प्रकरणात नवनवे पॅटर्न राबले जातात. आता एका नव्या पॅटर्नचा एक खळबळजनक प्रकरण समोर आला आहे. यामध्ये 'ग्रूमिंग पॅटर्न'चा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं. धर्मांतर करण्याचा आणि तिला दुसऱ्या युवकाच्या हवाली करण्याचा प्रयत्न झाला. हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या मुलीला इंदूरमधील एका घरातून ताब्यात घेतलं आहे. त्यावेळी ही मुलगी बुरख्यामध्ये होती.
ही घटना मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये घडली आहे. तपासादरम्यान 19 वर्षीय इमान नावाचा युवक तिला घेऊन इंदूरला गेल्याचे निष्पन्न झाले. या कटात मुलीच्या दोन मैत्रिणी आणि आरोपीच्या कुटुंबाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 6 महिन्यांपूर्वी अहमदनगरमधील एका अल्पवयीन मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर त्याने तिला आपला मित्र मोईन याच्या हवाली केले. हा सर्वच प्रकार धक्कादायकच नाही तर हादरवून सोडणारा आहे.
हिंदू जागरण मंचने आरोप केला आहे की, हे केवळ प्रेमप्रकरण नसून एक संघटित 'ग्रूमिंग' कट आहे. यामध्ये असुरक्षित कुटुंबातील मुलींना लक्ष्य केले जाते. त्यांना महागड्या भेटवस्तू देऊन विश्वास संपादन केला जातो. नंतर त्यांचे शोषण करून त्यांना दुसऱ्या टोळीकडे सोपवले जाते. सीएसपी पुष्पा प्रजापती यांनी सांगितले की, 24 तासांच्या आत मुलीला शोधण्यात यश आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच जण हादरले आहेत.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे
- पीडितेवर 6 महिन्यांपासून पाळत ठेवून तिला जाळ्यात ओढले गेले.
- मुख्य आरोपीने पीडितेचे शोषण केल्यानंतर तिला आपल्या मित्राकडे सोपवले.
- मुलीला पळवण्यासाठी आरोपीच्या कुटुंबाने आणि काही स्थानिक महिलांनी मदत केली.
सीएसपी पुष्पा प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारीला मुलगी बेपत्ता झाली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी इंदूरमध्ये छापा टाकला आणि मुलीला सुरक्षित बाहेर काढले. "ग्रूमिंग गँग" च्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करणे, त्यांचे धर्मांतर करणे किंवा त्यांना मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढणे असे गंभीर प्रकार घडत असल्याचा संशय हिंदू संघटनांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.