Ambernath News: 'आई-बाबा मला माफ करा...', पोलीस भरतीतील अपयशाने अंबरनाथमध्ये तरुणीचा टोकाचा निर्णय

Ambernath News: अंबरनाथमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून पोलीस होण्याचे स्वप्न उरल्याने एका तरुण मुलीने स्वत:चे आयुष्य संपवले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ambernath News: या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ:

Ambernath News: अंबरनाथमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून पोलीस होण्याचे स्वप्न उरल्याने एका तरुण मुलीने स्वत:चे आयुष्य संपवले.  पोलीस भरतीमध्ये वारंवार येणाऱ्या अपयशामुळे आलेल्या नैराश्यातून या 26 वर्षीय तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंबरनाथ पश्चिम भागातील भेंडी पाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. प्रतीक्षा राणे असे या मृत तरुणीचे नाव असून ती गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रचंड मेहनत घेत होती. खाकी वर्दी परिधान करून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची आणि त्यांना सुखी ठेवण्याची तिची जिद्द होती. मात्र, नशिबाने साथ न दिल्याने प्रत्येक वेळी तिला अपयशाचा सामना करावा लागत होता.

आई-वडिलांची माफी मागत संपवले आयुष्य

प्रतीक्षाने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यातील मजकूर वाचून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. तिने आपल्या चिठ्ठीत लिहिले की, आई-बाबा मला माफ करा, मला नोकरी लागल्यानंतर तुम्हाला जे आयुष्य द्यायचे होते, ते मी देऊ शकले नाही. नोकरी मिळत नसल्याच्या वैफल्यातून तिने 26 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपवली.

( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )

या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रतीक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शब्बीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना धक्का

प्रतीक्षा राणे हिच्या निधनामुळे केवळ तिच्या कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस भरतीसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या एका जिद्दी तरुणीचा असा करुण अंत झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्येही चिंतेचे आणि निराशेचे वातावरण पाहायला मिळत आहे. आपल्या मुलांनी यशाच्या अपयशाच्या पलीकडे जाऊन आयुष्याचा विचार करावा, अशी भावना आता व्यक्त होत आहे.


 

Topics mentioned in this article