Tragedy on Exam Day: एका बाजूला उज्ज्वल भविष्याची स्वप्ने, डोळ्यात जिद्द आणि हातात दहावीच्या बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट घेऊन दोन बहीण-भाऊ घराबाहेर पडले. आजचा पेपर चांगला सोडवून प्रगतीच्या दिशेने एक पाऊल टाकायचे, हाच विचार त्यांच्या मनात होता. खांद्यावर दप्तराचे ओझे आणि हातात पेन घेऊन हे दोघेही परीक्षेच्या केंद्राकडे जात होते.
मात्र, नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. वाटेतच काळ दबा धरून बसला होता आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा काळ दुसरा कोणी नसून त्यांचा स्वतःचा सख्खा रक्ताचा नातेवाईक होता. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि दोन कोवळ्या जीवांचा अंत झाला.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेश राज्यातील सीहोर जिल्ह्यामध्ये ही हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. सीहोर जिल्ह्यातील सिद्दीकगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धरमपुरी या गावात शुक्रवारी सकाळी या थराराने संपूर्ण परिसर हादरून गेला. सख्ख्या काकानेच त्याच्या पुतण्या आणि पुतणीची अतिशय निर्घृणपणे हत्या केली.
( नक्की वाचा : Triple Talaq :'दिरासोबत हलाला कर, तरच घरात घेतो',भयंकर अटीमुळे दोन चिमुकल्यांच्या आईचा तडफडून मृत्यू )
मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षांची शीतल आणि 18 वर्षांचा कुलदीप हे दोघे बहीण-भाऊ शुक्रवारी सकाळी आपल्या घरून दहावीची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. त्यांच्याकडे त्यांचे रोल नंबर आणि परीक्षेचे साहित्य होते. मात्र, घरून काही अंतरावर जाताच त्यांचा सख्खा ताता हरिसिंह मालवीय याने त्यांच्यावर लाकडी दांडक्याने भीषण हल्ला चढवला.
आरोपीने या दोघांच्या डोक्यावर आणि शरीरावर इतके वार केले की त्यांना सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. भररस्त्यात हे दोन्ही बहीण-भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर विखुरलेली त्यांची हॉल तिकिटे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
( नक्की वाचा : Pune News: लेकीसाठी बाप झाला 'सिंघम'! हुल्लडबाजाला पुण्यातील भर कॉलेजमध्येच चोपले, पाहा VIDEO )
काय आहे हत्येचं कारण?
मृत मुलांचे वडील जगदीश मालवीय यांनी या घटनेबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. हा हल्ला अचानक झालेला नसून तो एका मोठ्या कटाचा भाग होता. आरोपी हरिसिंहला माहित होते की आज मुलांचा पेपर आहे आणि ते याच रस्त्यावरून जाणार आहेत. त्यामुळे तो सकाळपासूनच हातात लाकडी दांडा घेऊन दबा धरून बसला होता.
जुन्या कौटुंबिक वादाचा आणि रंजिशीचा बदला घेण्यासाठी त्याने या निष्पाप मुलांचा बळी घेतला. आपल्या पोटच्या गोळ्यांचा असा अंत झालेला पाहून वडिलांचा आणि संपूर्ण कुटुंबाचा आक्रोश थांबत नाहीये.
या दुहेरी हत्याकांडानंतर संपूर्ण धरमपुरी गावात शोककळा पसरली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आरोपी फरार
हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी हरिसिंह मालवीय घटनास्थळावरून पसार झाला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता रावत यांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस पथके जंगलात आणि आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत. लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील, असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, एका काकानेच त्याच्या पुतण्यांचा असा बळी घेतल्याने संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे.