हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट आले आणि गेले. पण 'शोले'ची जादू आजही कायम आहे. हा फक्त एक चित्रपट नाही, तर एक असा सिनेमॅटिक अनुभव आहे जिथे प्रत्येक पात्र, कितीही लहान असले तरी, प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आहेत. चित्रपटातील एक संवाद आजही लोकांच्या तोंडी आहे. तो म्हणजे "अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार ने?" उत्तर - "पूरे पचास हज़ार." फक्त हा एक संवाद आणि पडद्यावर काही मिनिटांची उपस्थिती, यामुळे मॅक मोहन हे नाव कायमचे अमर झाले. 'शोले'पूर्वी ते छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसायचे. पण त्यांना फारशी ओळख नव्हती.
मॅक मोहन यांच्या बाबत आणखी एक गोष्ट जी कदाचीत लोकांना माहित नसेल. ते अभिनेत्री रवीना टंडनचे मामा होते. जेव्हा रमेश सिप्पी यांनी त्यांना 'शोले'मध्ये सांभाची भूमिका दिली, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता, "पूर्ण चित्रपटात माझा फक्त एकच संवाद आहे. मी हा चित्रपट करायला हवा का?" सिप्पींचे उत्तर होते, "हा एकच संवाद तुमची ओळख बनवेल." आणि तसेच झाले. रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली आणि सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या पटकथेमुळे सांभा गब्बर सिंगचा सर्वात विश्वासू साथीदार म्हणून ओळखला गेला. गब्बर वारंवार "अरे ओ सांभा" असे ओरडत असे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याची टोळीतील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणून प्रतिमा निर्माण झाली.
या चित्रपटात कॅमेराची भाषाही तेवढीच प्रभावी होती. प्रत्येक वेळी गब्बरने हाक मारल्यावर कॅमेरा खालून वर डोंगराच्या शिखराकडे फिरत असे, त्यामुळे सांभाचे ठिकाण तिथेच आहे, ही बाब कायमची निश्चित झाली. यालाच उत्कृष्ट सिनेमॅटिक भाषा म्हणतात. संवादातून पात्राला ओळख देणे आणि कॅमेऱ्याने त्याचे स्थान निश्चित करणे हे शोलेनं दाखवून दिले. विशेष बाब म्हणजे, चित्रपटाच्या शेवटी सांभा मारला जातो, पण ते प्रेक्षकांना दिसत नाही.
नक्की वाचा - 50 Years Of Sholay: Emergency मुळे ठाकूर करू शकला नाही गब्बरचा खात्मा
मॅक मोहन यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटात त्यांचा शेवट कधी झाला हे त्यांनाही कळले नाही. कदाचित याचे कारण असे की त्यावेळी क्लायमॅक्सवर इतकी चर्चा चालू होती की हा प्रश्न मागे पडला. 'शोले'मधील सांभा हे एकमेव असे छोटे पात्र नव्हते जे अमर झाले. या चित्रपटातील अनेक पात्रं जसे सुरमा भोपाली, जेलर, इमाम साहेब, आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हीच 'शोले'ची जादू आहे. जिथे प्रत्येक चेहरा, प्रत्येक आवाज आणि प्रत्येक संवाद एक आठवण बनतो.