Sahiya Movie : 'सैराट' फेम रिंकू राजगुरूचा नवा चित्रपट अडचणीत! सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र का नाकारले?

Sahiya movie CBFC censor issue: आदिवासी समाजाची प्रेमकथा आणि जंगलातील पार्श्वभूमी दाखवणाऱ्या 'सहिया' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून (CBFC) प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sahiya Movie : या निर्णयामुळे बॉलिवूड विश्वात मोठी खळबळ उडालीय.
मुंबई:

Sahiya movie CBFC censor issue: आदिवासी समाजाची प्रेमकथा आणि जंगलातील पार्श्वभूमी दाखवणाऱ्या 'सहिया' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून (CBFC) प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. या निर्णयामुळे बॉलिवूड विश्वात मोठी खळबळ उडालीय. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि माजी पत्रकार संजय शर्मा यांनी सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या चित्रपटासोबत दुजाभाव केला जात असल्याचे सांगत, उच्चस्तरीय पुनर्विचार समितीनेही प्रमाणपत्र नाकारले तर आपण याविरोधात थेट हायकोर्टात धाव घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

काय आहे आरोप?

संजय शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन सेन्सॉर बोर्डाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. 30 एप्रिल रोजी प्राधान्य श्रेणीत (प्रायोरिटी कॅटेगरी) हा चित्रपट सीबीएफसीसमोर सादर करण्यात आला होता. 

Advertisement

या श्रेणीत नियम नियमांनुसार अवघ्या 5 दिवसांत चित्रपट पाहणे अपेक्षित असते. यासाठी नियमित शुल्काच्या 3 पट जास्त शुल्क भरूनही तब्बल 51 दिवस सेन्सॉर बोर्डाच्या समितीने चित्रपट पाहिलाच नाही, असा दावा शर्मा यांनी केला आहे.

हा चित्रपट नक्षलवाद आणि हिंसाचाराचे समर्थन करतो असा आक्षेप घेत सीबीएफसीच्या पुनरावलोकन समितीने प्रमाणपत्र नाकारले आहे. यावर उत्तर देताना संजय शर्मा म्हणाले की, केवळ जंगलाची पार्श्वभूमी आणि आदिवासींचे जीवन दाखवले म्हणजे तो नक्षलवाद होत नाही. नक्षलवादी आणि पोलिसांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर फुललेली एका आदिवासी तरुण जोडप्याची ही प्रेमकथा असून त्यातून प्रेम आणि शांततेचा संदेश देण्यात आला आहे. 

पडद्यावर तीव्र हिंसाचार दाखवणाऱ्या इतर चित्रपटांना प्रमाणपत्र मिळते, तर मग एका शांतताप्रिय प्रेमकथेला नकार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पत्रकारितेच्या पार्श्वभूमीमुळे दुजाभाव झाल्याचा संशय

संजय शर्मा यांचा 4PM या डिजिटल वृत्तमंचाशी जवळचा संबंध आहे. याच पत्रकारितेच्या पार्श्वभूमीमुळे आपल्या चित्रपटाला अडवण्यात येत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने 4PM शी असलेल्या संबंधांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप असल्याचे सांगितल्याचा दावाही शर्मा यांनी केला. याशिवाय चित्रपटातील नेमके कोणते दृश्य किंवा संवाद आक्षेपार्ह आहेत, याचे कोणतेही स्पष्टीकरण नाकारण्याच्या पत्रात देण्यात आलेले नाही. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) अर्ज दाखल केला आहे.


झारखंडमधील नेतरहाटच्या निसर्गरम्य आणि घनदाट जंगलात 'सहिया' या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेते नीरज काबी, शांतनू मुखर्जी आणि 'सैराट' फेम रिंकू राजगुरू यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता सेन्सॉर बोर्डाच्या या  भूमिकेनंतर चित्रपटाचे भविष्य काय असणार आणि हे प्रकरण कोर्टात जाणार का, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

Advertisement