CM Eknath Shinde : 'मला काही सांगायचंय...'; चित्रपटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रंगमंचावर!

मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संगीत, मोठा पडदा, पुस्तकांनंतर रंगमंचाची मदत घेतली जात आहे. 

Advertisement
Read Time: 3 mins
ठाणे:

कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करीत असतात. समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत रसिक प्रेक्षक आणि सामान्य नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा जणू ते ठाव घेत असतात.  सुप्रसिद्ध कलाकार अशोक समेळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न त्यांच्या द्विपात्री नाटकातून करणार आहेत.  (two part play on Chief Minister Eknath Shinde)

लवकरच ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ आणि त्यांचे पुत्र आणि कलाकार संग्राम समेळ रंगमंचावर 'मला काही सांगायचं आहे...' (एकनाथ संभाजी शिंदे)  या विषयावर द्विपात्री सादर करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संगीत, मोठा पडदा, पुस्तकांनंतर रंगमंचाची मदत घेतली जात आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विशेष म्हणजे ठाण्यातील  सुप्रसिद्ध कलाकार अशोक समेळ यांना देखील एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल जाणून घेण्याची कायमच उत्सुकता होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी हितगुज करत अनेक गोष्टींचा उलगडा करणारे द्विपात्री नाटक शिंदे यांच्या परवानगीने तयार केल्याची माहिती समेळ यांनी  एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिली.

या द्विपात्री प्रयोगाची रंगीत तालीम सुरू असून आम्ही तयारीत आहोत लवकरच हे नाटक रंगमंचावर येईल अशी माहिती अशोक समेळ यांनी दिली.  प्रदीप ढवळ यांनी या द्विपात्रीचे लेखन केलं आहे. विशेष म्हणजे कोणीही सामान्य प्रेक्षक हे नाटक विनामूल्य पाहू शकतात. यामध्ये दीड तास द्विपात्रीचा प्रयोग झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रश्न उत्तरांचाही कार्यक्रम करण्याचा एक विचार असल्याचे समेळ यांनी सांगितलं. यामुळे प्रेक्षकांचा मनातील भावना नेमक्या काय आहेत हे जाणून घेता येईल आणि त्यांच्या विचारांना गती देता येईल आणि शंकांचे निरसन देखील करण्याचा प्रयत्न करता येईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. 

नक्की वाचा - महायुतीची सत्ता येणार?  शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व्हेत नेमकं काय आलंय समोर? 

धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर चित्रित केलेला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काहीच दिवसात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी काही खऱ्या गोष्टी मला चित्रपटात दबावामुळे दाखवता आल्या नाही असे सांगत पुन्हा धर्मवीर दोन या चित्रपटाची निर्मिती करत असल्याची घोषणा केली. याचवेळी त्यांनी आपले आत्मचरित्र देखील प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी अनेक गोष्टी उलगडल्या आहेत. त्यानंतर आता रंगमंचावरही ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, कलाकार संग्राम समेळ आणि लेखक प्रदीप ढवळ यांच्या कलेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास आणि कटू निर्णय का घ्यायला लागले याची उत्तरं उलगडणार आहेत. 

सध्या विधान सभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकांपर्यंत आपल्या मनातील गोष्टी सांगण्यासाठी आणि आपण केलेली कामे पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाटकाच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.