- ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार राष्ट्रपतींकडून प्रदान करण्यात आला
- धर्मेंद्र यांच्या वतीने त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला
- धर्मेंद्र यांचे चित्रपटसृष्टीतील सहा दशकांपेक्षा जास्त काळ योगदान व संस्कृतीचे प्रतीक असल्याचा उल्लेख केला
भारतीय चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मविभूषण' मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे. आज 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा बहुमान देण्यात आला. हा पुरस्कार कोण स्विकारणार याबाबत उत्सुकता होती. त्यात ही पत्नी हेमा मालिनी की पहिली पत्नी प्रकाश कौर हा पुरस्कार स्विकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण धर्मेंद्र यांच्या वतीने त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी धर्मेंद्र यांच्या आठवणींनी हेमा मालिनी आणि त्यांची कन्या अहाना देओल अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना हेमा मालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "धर्मजी या पुरस्कारासाठी खरोखरच पात्र होते. हा सन्मान त्यांना खूप आधी मिळायला हवा होता, पण शेवटी त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव झाला," असे त्या म्हणाल्या. धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत 6 दशकांपेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. ते केवळ एक उत्तम अभिनेते नव्हते, तर भारतीय संस्कृतीचे प्रतीक होते, अशा शब्दांत त्यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतरच्या गेल्या 6 महिन्यांच्या काळातील विरहाचा उल्लेख करताना हेमा मालिनी यांचे डोळे पाणावले. "त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पना करणे आजही कठीण आहे. घरात त्यांची उपस्थिती नेहमीच आनंददायी असायची. आज हा पुरस्कार स्वीकारताना ते माझ्यासोबतच आहेत, अशी मी मनाशी कल्पना केली आहे," असे भावुक उद्गार त्यांनी काढले. हा पुरस्कार जगभरातील लाखो चाहत्यांच्या वतीने स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार हेमा मालिनी यांनी स्विकारला त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांच्यासोबत दिल्लीला आलेली मुलगी अहाना देओल या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. ती ही आपल्या भावना रोखू शकली नाही. तिने ही आपल्या अश्रूंना वाट करून दिली. पुरस्कार स्विकारल्यानंतर "हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आणि तितकाच भावनिकदृष्ट्या कठीण आहे," अशा शब्दांत हेमा मालिनी यांनी आपल्या भावना जाहीर केल्या.