Hema Malini Breaks Silence on Deol Family Feud: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे नोव्हेंबर 2025 मध्ये निधन झाल्यानंतर देओल कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या 79 व्या बाफ्टा (ब्रिटीश अकादमी फिल्म अवॉर्ड्स) सोहळ्यात धर्मेंद्र यांना मरणोत्तर विशेष सन्मान देण्यात आला. या जागतिक मंचावर स्थान मिळवणारे ते या वर्षातील एकमेव भारतीय कलाकार ठरले.
या अभिमानास्पद क्षणी धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, यावेळी त्यांनी केवळ धर्मेंद्र यांच्या आठवणीच जागवल्या नाहीत, तर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबतच्या कथित मतभेदांवरही स्पष्ट भाषेत उत्तर दिलं आहे.
कौटुंबिक वादाच्या चर्चांवर हेमा मालिनींचं रोखठोक उत्तर
नेहमीच सोशल मीडिया आणि गॉसिप वर्तुळात धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मुले सनी-बॉबी आणि दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्या मुली ईशा-अहाना यांच्यात वितुष्ट असल्याच्या बातम्या येत असतात. मात्र, या सर्व चर्चांना हेमा मालिनी यांनी पूर्णविराम दिला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, मुलांच्या मनात एकमेकांबद्दल कोणतीही नकारात्मकता नाही. सनी असो वा बॉबी किंवा ईशा आणि अहाना, ही सर्व मुले धरमजींवर प्रचंड प्रेम करतात. जेव्हा धरमजी सोबत असतात, तेव्हा तिथे नकारात्मकतेला जागाच उरत नाही, असं त्यांनी ठामपणे मांडलं.
( नक्की वाचा : Dharmendra Net Worth: धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती किती? 100 एकर जागेत बनवलंय फार्म हाऊस, वाचा सर्व डिटेल्स )
'बॉर्डर 2' च्या स्क्रीनिंगचं नेमकं सत्य काय?
नुकतंच सनी देओलच्या 'बॉर्डर 2' चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला बॉबी देओलने हजेरी लावली होती, मात्र हेमा मालिनी तिथे दिसल्या नव्हत्या. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं.
या विषयावर खुलासा करताना हेमा मालिनी म्हणाल्या की, सनी आणि बॉबी यांची मनापासून इच्छा होती की मी येऊन हा चित्रपट पाहावा. त्यांनी मला सन्मानाने निमंत्रितही केलं होतं, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे मला तिथे पोहोचता आलं नाही. याचा अर्थ असा मुळीच नाही की आमच्यात काही वाद आहेत. आम्ही आमचे कौटुंबिक क्षण कॅमेऱ्यासमोर दाखवत नाही आणि ते दाखवण्याची गरजही आम्हाला वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
धरमजींनी दिली मूल्यांची शिदोरी
हेमा मालिनी यांनी भावूक होत सांगितलं की, धरमजी हे केवळ एक सुपरस्टार नव्हते, तर ते प्रेम आणि संस्कारांचा एक मोठा स्रोत होते. त्यांनी आपल्या सर्व मुलांना जे मूल्य दिले आहेत, त्यामुळेच आज संपूर्ण कुटुंब कठीण काळात एकमेकांच्या सोबत उभे आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाला 24 फेब्रुवारी रोजी तीन महिने पूर्ण झाले असून, आजही त्यांचे स्पॉट बॉय आणि सहकारी त्यांच्या आठवणीने रडतात.
या प्रसंगात संपूर्ण कुटुंब एकजूट होऊन या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हेमा मालिनी यांनी सांगितलं. आम्ही सर्वजण ठीक आहोत आणि लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमचं नातं जपण्याला महत्त्व देतो, असं सांगत त्यांनी वादाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.