औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन सध्या राज्यात हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावरुनच नागपूरमध्ये सोमवारी सायंकाळी मोठा हिंसाचार झाला. नागपूरच्या महाल, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी, भालदारपुरा या भागात काही समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. यामध्ये नागरिकांसह पोलिसही जखमी झालेत. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. यावरुनच मराठी अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पाने खरमरीत पोस्ट करत सत्ताधाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत विद्याधर जोशी?
"नागपुरात दोन गटात दंगल !! जे पेराल तेच उगवत!! गाडला होता ना एवढे वर्ष त्याला. जमिनीत झोपला होता तो.काही फरक पडला होता?? ढोसून ढोसून उकरून बाहेर काढलंत त्याला. आता त्याचं भूत तुमच्या खांद्यावरती बसून खादाखदा हसेल आणि त्या भुताला ताकद, बळ कोण देतय तर ज्यांची शिवराय संभाजी आणि जिजाऊ यांची नाव मनात आणण्याची सुद्धा लायकी नाही असे राजकीय पुढारी", अशी टीका जोशी यांनी केली आहे.
तसेच "खरी खोटी बातमी पसरली की लगेच उतरले सगळे गट राडे करायला!! इतके भ्रष्टाचारी, बलात्कारी, खुनी औरंगजेब आजुबाजूला आहेत, त्यांचे पुतळे यांना कधी जाळावे असे वाटत नाही. त्यांना कबरीत गाडाव ,त्यांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्य लोकां विरुद्ध आंदोलन करावं असं वाटत नाही आणि निघाले so called धर्माभिमानाचा झेंडा खांद्यावर घेऊन. अर्थात ह्यांनी भडकवल्यावर आपण भडकणारी मूर्ख जनता ही कारणीभूत आहोत त्याला', अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, मराठी अभिनेता हेमंत ढोमे यानेही नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेवरुन नागरिकांना आवाहन केले आहे. नागपूरकर आणि महाराष्ट्रातील तमाम समजुतदार नागरिकांना कळकळीची विनंती! कृपया शांतता आणि सलोखा जपा! ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा! ते चिथवतील, आपण शांततातेचा मार्ग धरायचा! ते बरळतील, आपण विचार सांगायचा! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जपायचा, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.