Raja Shivaji Movie Controversy : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अस्मिता आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित कोणताही चित्रपट जेव्हा रुपेरी पडद्यावर येतो, तेव्हा शिवप्रेमींच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात. सध्या रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यातील एका प्रसंगावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि वादाला सुरुवात झाली आहे.
17 व्या शतकातील प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली अफजल खानाची भेट आणि त्याचा वध हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली अध्याय आहे. याच अध्यायातील 'वाघनखां'चा वापर दाखवताना रितेशने घेतलेल्या 'स्वातंत्र्या'मुळे इतिहासतज्ज्ञ आणि नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.
ट्रेलरमधील 'तो' सीन आणि नेटकऱ्यांचा संताप
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रितेश देशमुख (शिवाजी महाराज) हे संजय दत्त (अफजल खान) याला मारण्यापूर्वी हातातील 'वाघनखं' उघडपणे दाखवतात आणि एक तडाखेबंद डायलॉग फेकून मग हल्ला करतात. याच दृश्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही भेट निशस्त्र ठरली होती आणि खानाचा देह अवाढव्य असल्याने महाराजांनी वाघनखं लपवून नेली होती. ती आधीच उघडपणे दाखवणे म्हणजे इतिहासाचे चुकीचे सादरीकरण आहे, असा आरोप करत काहींनी रितेशवर टीका केली आहे.
इतिहासतज्ज्ञ नक्की काय म्हणतात?
या वादावर दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांनी महत्त्वपूर्ण मत मांडले आहे. त्यांच्या मते, " महाराजांनी वाघनखं आधीच दाखवली असती, तर अफजल खान सावध झाला असता किंवा तो भेटीतून बाहेर पडला असता. ही शस्त्रे लपवलेली असणे हेच तर्कसंगत वाटते. मात्र, व्यावसायिक सिनेमांकडून आपण नेहमीच ऐतिहासिक तर्काची अपेक्षा करू शकत नाही. चित्रपट अनेकदा लोकांच्या भावनांशी जोडून नफा मिळवण्यासाठी थोडे बदल करतात."
पुणे विद्यापीठातील डॉ. राहुल मगर यांच्या मते, सभासद बखर आणि इतर ऐतिहासिक साधनांनुसार वाघनखांचा वापर झाला हे सत्य आहे. मात्र, ते उघडपणे दाखवणे हे केवळ नाटकीय असू शकते. अफजल खान धिप्पाड होता, त्यामुळे त्याला चकित करण्यासाठी शस्त्राचे गुपित राखणे अत्यंत आवश्यक होते. "हा चित्रपट आहे, डॉक्युमेंटरी नाही. निर्मात्यांना थोडे स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.