संजय मिश्रा यांची ओळख बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात, संजय मिश्रा यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जी भूमिका मिळेल ती जीव ओतून काम करणारा अभिनेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. भूमिका विनोदी धाटणीची असो अथवा भावनिक, ती उत्कृष्ट कशी होईल याकडे संजय मिश्रा यांचे लक्ष असते. त्यांच्या याच कौशल्यामुळे संजय मिश्राचे नाव बॉलीवूडमध्ये गाजते आहे आणि आजही त्यांच्या वाटेला उत्तम चित्रपट येत असतात. मात्र एक काळ असा होता जेव्हा संजय मिश्रा यांना प्रचंड अडचणींचा सामना करा लागला होता.
दहावीत दोनदा नापास
बिहारमध्ये जन्मलेल्या संजय मिश्राचे वडील वृत्त वार्ता विभागात काम करत होते. संजय मिश्रा यांचं मन अभ्यासात कधीच लागलं नाही. अभ्यासात ढ असल्याने ते दहावीत दोनवेळा नापास झाले होते. त्यानंतर ते खिशात अवघे पन्नास रुपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली होती. संजय मिश्रांना पाहून प्रसिद्ध लेखक मनोहर श्याम जोशी यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं होतं की या मुलाचं भविष्य नाटकात आहे. त्यानंतर संजय मिश्रा यांनाला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. NSDच्या प्रवेश परीक्षेत संजय मिश्रा यांनी पहिला नंबर मिळवला होता, मात्र संजय मिश्रा यांचे मन तिथेही रमले नव्हते. त्यांनी एनएसडीतून पळून जाण्याचा अनेकदा विचार केला होता, मात्र हे धाडस ते करू शकले नाही. एनएसडीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर संजय मिश्रा यांना पुढची अनेक वर्ष चित्रपटात कामच मिळाले नाही.
150 रुपये पगार, ढाब्यावर काम
बॉलीवूडमध्ये काम मिळत नसल्याने संजय मिश्रा यांनी छोट्या पडड्याकडे आपली पावले वळपली होती. अनेक मालिकांमध्ये त्यांना कामे मिळाली. नया दौर, ऑफिस ऑफिस, कभी पास कभी फेल, आहट यांसारख्या हिट मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. सगळं रुळावर आलं आहे असं वाटत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. संजय मिश्रा यांच्यासाठी हा जबर मानसिक धक्का होता. त्यांनी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेत मनशांतीसाठी वणवण करायला सुरुवात केली. काही महिन्यांनंतर ते ऋषिकेशमधील एका ढाब्यावर काम करताना दिसले होते. या ढाब्यावर काम करण्याच्या बदल्यात त्यांना फक्त 150 रुपये पगार मिळत होता. काहींनी संजय मिश्रा यांना ओळखलं आणि त्यांच्या घरच्यांना कळवलं. घरच्या मंडळींनी संजय मिश्रा यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला. घरच्या मंडळींनी सावरल्यानंतर संजय मिश्रा यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने त्यांना चित्रपटात काम दिलं आणि तिथून त्यांच्या कारकिर्दीला पुन्हा उभारी मिळाली.