Abhishek Bachchan Karisma Kapoor breakup reason: बॉलीवूडमधील सर्वात गाजलेल्या अफेअर्सपैकी एक म्हणजे अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची प्रेमकहाणी. या दोन बड्या स्टार्सचं लग्न होणार होतं. त्यांचा साखरपुडाही झाला होता, मात्र ऐनवेळी हे लग्न मोडले. या घटनेला आता 22 वर्ष उलटली आहेत. तरीही त्यांचं अभिषेक आणि करिश्माचं ब्रेकअप का झालं? त्या रात्री नक्की काय घडले होते? याची उत्सुकता कायम आहे. या दोन बड्या स्टार किड्सचं लग्न का तुटलं? याबाबतची नवी माहिती आता समोर आली आहे.
कुणाचा होता सुरुवातीपासून विरोध?
दिवंगत अभिनेते मुकरी यांची मुलगी नसीम मुकरी यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
नसीम मुकरी यांच्या दाव्यानुसार, करिश्मा कपूरची आई बबिता यांचा या नात्याला पहिल्या दिवसापासूनच तीव्र विरोध होता. करिश्मा आणि अभिषेक यांच्यात 'हाँ मैंने भी प्यार किया' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याआधीपासूनच प्रेमसंबंध होते. मात्र बबिता यांना हे नाते अजिबात मान्य नव्हते. त्या काळात करिश्मा ही अभिषेकपेक्षा खूप मोठी आणि यशस्वी स्टार होती. त्यामुळेच बबिता यांनी या लग्नासाठी काही कडक अटी ठेवल्याचे नसीम यांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा : Karisma Kapoor :21 वर्षांची झाली करिश्मा कपूरची मुलगी, वडिलांची होती लाडकी लेक, भावाशी खास बॉन्डिंग, Photos )
लग्नाआधी पैशांच्या हस्तांतरणाची आणि कराराची अट
मुलाखतीत नसीम मुकरी यांनी दावा केला की, बबिता यांनी करिश्माला अभिषेककडून लग्नापूर्वीच काही कोटी रुपये खात्यावर ट्रान्सफर करून घेण्यास सांगितले होते. इतकेच नाही तर भविष्यात काही कारणास्तव घटस्फोट झाला, तर करिश्माला किती रक्कम मिळेल, असा एक प्री-नप्शियल करार (लग्न करार) करण्याची अटही त्यांनी ठेवली होती. मात्र बच्चन कुटुंबाने या अटी स्वीकारण्यास थेट नकार दिला. याच पैशांच्या आणि कराराच्या अटींमुळे अखेर हा साखरपुडा मोडला, असा दावा नसीम यांनी केला आहे.
करिश्मा अभिषेकच्या प्रेमात होती तरीही....
जेव्हा मुलाखतकाराने विचारले की, करिश्मा जर अभिषेकच्या प्रेमात होती, तर तिने आईचे ऐकून हे नाते का तोडले? यावर उत्तर देताना नसीम म्हणाल्या की, बबिता या अत्यंत कडक आणि हुकूमशाही स्वभावाच्या आई होत्या. त्यांच्या या स्वभावाला करिना कपूरने विरोध केला आणि ती स्वतंत्र राहू लागली, मात्र करिश्मा नेहमी आपल्या आईसोबतच राहिली आणि तिने आईचा प्रत्येक निर्णय मान्य केला.
( नक्की वाचा : Abhishek Bachchan : घटस्फोटाच्या चर्चांचा आराध्यावर काय परिणाम? अभिषेक बच्चननं पहिल्यांदाच मौन सोडलं )
यापूर्वी 'हाँ मैंने भी प्यार किया' या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील दर्शन यांनीही एका पॉडकास्टमध्ये या दोघांच्या नात्यावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, अभिषेक आणि करिश्मा यांच्यात पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही खूप उत्तम केमिस्ट्री होती. त्यांच्यातील नाते अंतर्गत वादामुळे नाही, तर बाहेरील दबावांमुळे आणि हस्तक्षेपामुळे बिघडले.
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा 2002 च्या ऑक्टोबर महिन्यात मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. मात्र अवघ्या 3 महिन्यात म्हणजेच 2003 च्या जानेवारीत हा साखरपुडा अचानक मोडल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 2003 मध्येच करिश्माने दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूर यांच्याशी लग्न केले.