Chenab Rail Bridge : 6 जून 2025 हा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. 2003 मधील स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. संपूर्ण जगाचं याकडे लागलं आहे. LoC ते LAC पर्यंत याची (चिनाब ब्रिज) चर्चा आहे. त्यामुळे फक्त देशाची सैन्य ताकद वाढवणार नाही, तर पर्यटन आणि व्यापारालाही उंचीवर नेणार आहे. हे देशाच्या अभियांत्रिकीचं एक अद्भुत उदाहरण आहे.
एका रेल्वे पुलाचं इतरं महत्त्व का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर त्याचं उत्तर आम्ही सविस्तर देणार आहोत. हे सविस्तर उत्तर वाचण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे हा रेल्वे पूल पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे, हा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुब मीनारपेक्षा जवळपास 287 मीटर उंच आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला प्रकल्पाचा भाग
हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 'चिनाब रेल ब्रिज' राष्ट्राला समर्पित करणार आहेत. चिनाब रेल ब्रिज नदीच्या तळापासून 359 मीटर उंचीवर आहे. 272 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावरील 1215 मीटर लांबीचा हा ब्रिज उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे.
या पुलाच्या बांधकामाला 1486 कोटी रुपये खर्च आला आहे. हा पूल 266 किमी प्रति तास वेगाच्या वाऱ्यालाही तोंड देऊ शकतो. तसेच, हा ब्रिज भूकंपीय झोन पाचमध्ये स्थित असून, रिक्टर स्केलवर 8 तीव्रतेच्या भूकंपालाही सहन करण्यास सक्षम आहे.
( नक्की वाचा : भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट!)
जम्मू-काश्मीरला सर्व ऋतूंमध्ये देशाशी जोडणार
चिनाब रेल ब्रिजमुळे कटरा आणि श्रीनगर दरम्यानचा प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी होईल. चिनाब ब्रिजवर पहिला ट्रायल रन जून 2024 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला होता. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली.
या ब्रिजची पायाभरणी 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. याच्या बांधकामाला 22 वर्षे लागली. या ब्रिजचं अंदाजे आयुष्य 125 वर्षांपेक्षा जास्त आहे. याचे डिझाइन आणि तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे हे जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. चिनाब ब्रिज केवळ एक रेल्वे पूल नाही, तर जम्मू-काश्मीरला प्रत्येक ऋतूत देशाशी जोडण्याचे एक मजबूत माध्यम आहे.
चीन-पाकिस्तान का सतर्क?
चीनकडून या प्रकल्पाची हेरगिरी केली जात असल्याची बातमी नोव्हेंबर 2024 मध्ये उघड झाली होती. यासाठी चीननं त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचीही मदत घेतली होती. पाकिस्तानमध्ये चिनाब ब्रिजबद्दल धोक्याच्या बातम्या सतत प्रकाशित होत आहेत. पण याचे कारण काय आहे?
काश्मीर बर्फवृष्टीच्या दिवसांमध्ये भारतापासून वेगळा पडत असे. तसेच, अनेक क्षेत्रांमध्ये आपत्कालीन स्थितीत सैन्याला आपल्या हालचालीत या बर्फवृष्टीच्या वेळी खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. आता चिनाब रेल्वे ब्रिजच्या बांधकामुळे प्रत्येक ऋतूत काश्मीरमध्ये पोहोचणे सैन्यासाठी सोपे होईल. यासोबतच लडाखसारख्या क्षेत्रांमध्येही सैन्याची पोहोच सर्व ऋतूंमध्ये आता सोपी होईल. याचा अर्थ LoC ते LAC पर्यंत भारतीय सेना आता खूप लवकर पोहोचू शकेल. यामुळेच चीन आणि पाकिस्तान या ब्रिजबद्दल खूप सतर्क आहेत. कोणत्याही आगळीकेला तोंड देण्यास भारत समर्थ आहे, हा संदेश या ब्रिजच्या माध्यमातून भारतानं दिला आहे.