राकेश गुडेकर. प्रतिनिधी
Jagadguru Ramanandacharya Narendraacharya On Hindu Temples : राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमुळे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राम मंदिरातील चोरी अत्यंत निंदनीय असून यामुळे हिंदू धर्मियांच्या हृदयाला तीव्र ठेच पोहोचली आहे, गोरगरिबांनी पै-पै जमा करून राम मंदिराला निधी दिला आहे आणि तिथे जेव्हा चोरी होते, तेव्हा लोकांच्या भावना दुखावल्या जातात. शासन कायदेशीर कारवाई करेल व आरोपींना अटकही झाली असली, तरी लोकांच्या दुखावलेल्या भावनांची भरपाई कोणीही भरून देऊ शकत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सर्व मंदिरे आचार्यांच्या समितीकडे द्यावीत
मंदिरे कशी चालवली पाहिजेत, याचे प्रशिक्षण शासनाला नाही, कारण शासन हे निधर्मीवादी आहे. धर्म,संस्कृती,अध्यात्म आणि धर्माची काळजी घेणे हे शासनाला कळणार नाही आणि तशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे,असे महाराजांनी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे मुस्लिमांच्या मशिदी आणि ख्रिश्चनांचे चर्च त्यांच्या स्वतःच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे हिंदूंची सर्व मंदिरे अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य अशा आचार्यांची समिती गठीत करून त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी ठाम मागणी त्यांनी केली. मंदिरे ताब्यात आल्यास त्यांची योग्य धार्मिकता जपली जाईल, कारण शासनाचा अंकुश असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून चुका होण्याची शक्यता असते, असेही त्यांनी नमूद केले.
नक्की वाचा >> Mumbai News: मुंबईत खळबळ! वांद्र्याच्या 'या' प्रसिद्ध हॉटेलला ईडीचा दणका, प्रभादेवीतही मोठी प्रॉपर्टी जप्त
राम मंदिरातील चोरी प्रकरण आणि राजकारण
राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकारणाबाबत बोलताना महाराज म्हणाले की, विरोधकांनी आपले काम केले असून हिंदूंच्या अस्मिता आणि प्रेमावर कोणी आक्षेप घ्यावा असे नाही. देव हा केवळ काही हिंदुत्ववादी पक्षांचा नसून तो सर्वांचा आहे. संविधानाने धर्माला कधीही कमी लेखलेले नाही. त्यामुळे विरोधकांनीही धर्माला कमी लेखू नये. राजकीय मंडळींनी केवळ विरोधासाठी विरोध करणे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला.
नक्की वाचा >> Akola News: विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर अकोल्यात संतापाची लाट! त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी रास्ता रोको
धर्मेंद्र प्रधान राजीनामा आणि पेपरफुटी प्रकरण
पेपर फुटीच्या मुद्द्यावर तीव्र रोष व्यक्त करताना नरेंद्राचार्य महाराजांनी कडक कायदे करण्याची मागणी केली आहे. मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. देशात वारंवार पेपर फुटणे हे भूषणावह नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या रागाचा मोठा स्फोट झाला आहे. याप्रकरणी केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही. तर दोषींवर कारवाईसाठी कठोर ते कठोर कायदे केले पाहिजेत,असे सांगत त्यांनी सरकारने उचललेली पावले उत्तम असली तरी कायदेशीर सुधारणांची गरज असल्याचे अधोरेखित केले.