Kashmiri Pandits: एका रात्रीत घर सुटले; आणि..39 वर्षांनंतर काश्मीरमध्ये परतलेल्या सुपर्णाची मन हेलावणारी गोष्ट

Kashmiri Pandits return to Kashmir: जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे भरणाऱ्या प्रसिद्ध माता खीर भवानी मेळ्याच्या निमित्ताने एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Kashmiri Pandits: हा मेळा काश्मीरी पंडितांसाठी केवळ तीन दिवसांची यात्रा नसते...
मुंबई:

Kashmiri Pandits return to Kashmir: कधीकाळी ज्या गल्ल्यांमध्ये आपले बालपण गेले, ज्या अंगणात खेळलो-बागडलो, त्याच गल्ल्या तब्बल 36 ते 39 वर्षांनंतर डोळ्यांसमोर आल्यावर कोणाचेही काळीज भरून येईल. जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथे भरणाऱ्या प्रसिद्ध माता खीर भवानी मेळ्याच्या निमित्ताने असाच एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला. वर्षांनुवर्षे आपल्याच मायभूमीपासून दूर राहिलेल्या विस्थापित काश्मीरी पंडितांचे पाय जेव्हा पुन्हा एकदा काश्मीरच्या मातीला स्पर्शले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहू लागले. या सर्वांसाठी ही केवळ एका मंदिराची यात्रा नव्हती, तर आपल्या हक्काच्या घरात परतणाऱ्या लेकी-सुनांची आणि मुलांची एकात्मतेची आणि अपूर्व भेटीची भावनिक गोष्ट होती.

1990 साली काश्मीर खोऱ्यात पसरलेल्या दहशतवादामुळे अनेक कुटुंबांना आपले घरदार सोडून एका रात्रीत पळून जावे लागले होते. त्या काळात सुमारे 5 लाख काश्मीरी हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. त्यावेळी 8 वर्षांची असणारी सुपर्णा आज 44 वर्षांची झाली आहे. 

Advertisement

सुपर्णा, दुलारी, भूषण लाल यांच्यासारखे शेकडो लोक जेव्हा जम्मू येथून निघालेल्या 225 बसमधून काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाले, तेव्हा जुन्या आठवणींचा पूर त्यांच्या मनात दाटून आला होता. बस जशी जशी पुढे जात होती, तसे तसे त्यांचे मन बालपणातील त्या जुन्या अंगणाकडे धाव घेत होते.

36 वर्षांनंतर मायभूमीवर पहिले पाऊल

बसच्या खिडकीला घट्ट पकडून सुपर्णाने अत्यंत धीम्या आवाजात सांगितले की, माझ्यासाठी हा जुन्या आठवणींना उजाळा देणारा अत्यंत भावूक क्षण आहे. माझ्या स्वतःच्या घरी पोहोचण्यासाठी मला इतकी वर्षे वाट पाहावी लागली. या प्रवासात अनेक जण असे होते, ज्यांनी तब्बल 36 वर्षांनंतर काश्मीरच्या मातीवर पहिले पाऊल ठेवले होते. 

बसमध्ये बसलेले सर्व भाविक मोठ्या उत्साहात 'जय माता दी'चा गजर करत होते, पण या आवाजात भक्तीसोबतच वर्षानुवर्षे मनात साचलेले दुःख आणि डोळ्यांतील अश्रू  स्पष्ट दिसत होते.

हा मेळा काश्मीरी पंडितांसाठी केवळ तीन दिवसांची यात्रा नसून आपल्या माणसांना, आपल्या मातीला पुन्हा भेटण्याची सुवर्णसंधी असते. भूषण लाल नावाच्या एका भाविकाने दूर कुठेतरी पाहत सांगितले की, सध्या तरी आम्ही केवळ यात्रेकरू म्हणून जात आहोत, पण पुढच्या वर्षी मला कायमचे माझ्या घरी परत यायचे आहे. त्यांचे आई-वडील आपल्या हक्काच्या घरी परत जाण्याची अधुरी इच्छा मनात ठेवूनच या जगातून निघून गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

Advertisement

तर, दुलारी नावाच्या वृद्ध महिलेने सांगितले की, हे तीन दिवस आमच्यासाठी काय आहेत, हे मी शब्दात सांगू शकत नाही. काही काळासाठी का होईना, पण मी माझ्या काश्मीरच्या हवेत श्वास घेत आहे आणि माझ्या घरी आहे.

( नक्की वाचा : Gopal Patha : 'Bengal Files'मधील ‘तो' चेहरा; 1946 च्या हिंसाचारात कलकत्ताचे तारणहार ठरलेले ‘गोपाळ पाठा' कोण? )
 

काश्मीरी पंडितांचे कुलदैवत

गांदरबल जिल्ह्यातील माता रग्न्या देवी मंदिर हे काश्मीरी पंडितांचे कुलदैवत मानले जाते. येथे दरवर्षी ज्येष्ठ अष्टमीला खीर भवानी मेळ्याचे आयोजन केले जाते. काश्मीरी पंडितांसाठी या दिवसाला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे. विस्थापन आणि आपलेपणा यांच्यातील एक नाजूक पूल म्हणून या मेळ्याकडे पाहिले जाते. इथं येणाऱ्या यात्रेकरूंची एकच प्रार्थना आहे की, माता खीर भवानीने अशी परिस्थिती निर्माण करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या मातृभूमीत कायमचे परतता येईल.
 

Advertisement
Topics mentioned in this article