E-20 Petrol Impact On Mileage : देशात पर्यावरणपूरक इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलचा वापर वाढविण्यात येत आहे.मात्र,या इंधनामुळे वाहनांच्या मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते,अशी कबुली केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे.दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.
पुरी यांनी म्हटलंय की,"ई-20 पेट्रोलमुळे मायलेजवर किंचित परिणाम होऊ शकतो.मात्र,ही घट अत्यल्प असून ती केवळ इथेनॉलमुळेच होत नाही. वाहनाची स्थिती,इंजिनची कार्यक्षमता,रस्त्यांची परिस्थिती आणि वाहन चालविण्याची पद्धत अशा विविध घटकांचाही मायलेजवर परिणाम होत असतो. त्याचबरोबर ई-20 इंधनामुळे वाहनांचा पिक-अप आणि इंजिनची कार्यक्षमता अधिक चांगली होत आहे".
सोशल मीडियावर ई-20 पेट्रोल वापरल्यास वाहनाचा विमा रद्द होईल किंवा विमा दावा नाकारला जाईल,अशा अफवा पसरत आहेत.या दाव्यांना फेटाळून लावताना पुरी म्हणाले की,इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वाहन विम्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही.विमा कंपन्यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय सर्व आवश्यक आणि कठोर तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण-शिळ मार्गावर ट्रॅफिक जॅम, भाजपच्या पाहणी दौऱ्यावरून राजकारण तापलं, शिवसेना आमदार टार्गेटवर
पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये किंचित घट
इथेनॉल मिश्रण ही वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि पर्यावरणपूरक मोहीम आहे.यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल आणि देशाचे इंधन आयातीवरील अवलंबित्वही घटेल,असा विश्वास केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला.इथेनॉलचा वापर आता रेसिंग कारमध्येही मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे वाहनांचे अॅक्सिलेरेशन आणि एकूण कार्यक्षमता सुधारत असल्याचे सिद्ध झाले आहे,असंही ते म्हणाले.
ई-20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये किंचित घट होऊ शकते,अशी कबुली केंद्र सरकारने दिल्यानंतर या विषयावर तज्ज्ञांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.केमिकल इंजिनिअर आणि इथेनॉल तज्ज्ञ सुधीर पालीवाल यांच्या मते, पेट्रोल हे फॉसिल फ्युएल तर इथेनॉल हे बायोफ्युएल असल्याने दोन्ही इंधनांच्या ऊर्जा क्षमतेत सुमारे 8 ते 10 टक्क्यांचा फरक असतो.त्यामुळे पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर केल्यास मायलेजमध्ये 8 ते 10 टक्क्यांपर्यंत घट होणे स्वाभाविक आहे.
नक्की वाचा >> Rain News: तुफान पाऊस बरसणार! मुंबईसह 4 जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे कुठे शाळांना सुट्टी? हेल्पलाईन क्रमांक जारी
'NDTV'शी बोलताना सुधीर पालीवाल म्हणाले की,केंद्र सरकारने ई-85 (85 टक्के इथेनॉल मिश्रित) इंधन बाजारात आणले असून त्याची किंमत पेट्रोलपेक्षा सुमारे 10 रुपये प्रति लिटरने कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मायलेज कमी मिळाल्यास त्याची आर्थिक भरपाई काही प्रमाणात कमी दरातून होते. मात्र, ई-20 पेट्रोलच्या बाबतीत ग्राहकांना अशा प्रकारचा कोणताही थेट आर्थिक लाभ मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
इथेनॉलच्या वापराचे दीर्घकालीन फायदेही महत्त्वाचे असल्याचे पालीवाल यांनी नमूद केले.त्यांच्या मते,इथेनॉलमुळे ऊस आणि इतर पिकांपासून इंधननिर्मितीला चालना मिळून शेतकऱ्यांना फायदा होतो.तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो. त्यामुळे इथेनॉलच्या पर्यावरणीय आणि कृषी क्षेत्रातील फायद्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.