Puri Jagannath Rath Yatra : ओडिशातील पुरीमध्ये रथयात्रेदरम्यान दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी रथ ओढत असताना प्रचंड गर्दीमुळे 581 भाविक अस्वस्थ झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील किमान 8 भाविकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
काय घडलं?
पुरीमधील ग्रँड रोडवर रथयात्रेदरम्यान रथ ओढण्याच्या समारंभात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. याचवेळी प्रचंड गर्दीमुळे भाविक अस्वस्थ झाले. भगवान बलभद्र यांचा तालध्वज रथ ओढण्याचे काम सुरू झाले, त्यावेळी ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हजारो भक्तांनी आपली भक्ती आणि श्रद्धेपोटी तालध्वज रथाच्या दोरीला स्पर्श करण्यासाठी एकाच वेळी धाव घेतली. गर्दीने रथ अडीच किलोमीटर दूर असलेल्या गुंडिचा मंदिराकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी हा प्रकार घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या 581 भाविकांना हायटेक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामधील 173 जणांना हाय डिपेंडेंसी युनिट (एचडीयू) मध्ये हलवण्यात आले आहे. 68 जखमी भाविकांना बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचार देण्यात आले. तसेच, किमान 8 भाविकांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना जिल्हा मुख्यालय रुग्णालयात (डीएचएच) नेण्यात आले आहे.