इत्तेहा-ए-मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी 21 जुलै रोजी 23 हिंदू तरुण तरुणींचे धर्मातर करू असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे उत्तर प्रदेशमध्ये हिंदू समाजातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धर्मांतराच्या मुद्दावरून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. रझा यांच्या या विधानानंतर अखिल भारत हिंदू महासभेचे प्रवक्ते संजय जाट यांनी म्हटले की,"हिंदुत्ववादी संघटना आग्र्याहून बरेलीमध्ये मोठी मिरवणूक काढणार आहे.बरेलीमध्ये रझा राहात असून ते राहात असलेल्या ठिकाणापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे जाट यांनी म्हटले आहे. बँड बाजा घेऊन ही मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले."
जाट यांनी म्हटले की, ज्या तरुणींचे धर्मांतर करण्यात आले आहे अशा तरुणींचे धर्मपरिवर्तन करून त्यांना हिंदू धर्मात आणले जाईल आणि त्यांचे लग्न लावले जाईल. हे सगळे रझा यांच्या घरातच होईल असा इशारा जाट यांनी दिला आहे. 21 जुलै रोजी लग्नाची मिरवणूक बरेलीला पोहोचेल आणि 22 जुलै रोजी रिसेप्शन होईल असे त्यांनी म्हटले.
मौलाना तौकीर रझा यांनी घोषणा केली आहे की ते 21 जुलै रोजी 23 हिंदू तरुण-तरुणींचे धर्मांतर करणार आहेत. त्यांनी दावा केलाय की धर्मांतर केल्यानंतर 5 तरुण- तरुणींचा निकाह लावून देणार आहे. रझा यांच्या या विधानानंतर बरेली पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे.
हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या
तौकीर रझा यांच्या या वक्तव्यानंतर हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. भाजप, विहिंप, बजरंग दलासह विविध संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला आणि घोषणाबाजी केली. यावेळी या नेत्यांची अधिकाऱ्यांशी बाचाबाचीही झाली. तौकीर रझावर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन हिंदू संघटनांनी दिले आहे.