बांगलादेशवरील बैठकीत राहुल गांधींनी विचारला पाकिस्तानवर प्रश्न, परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं उत्तर

बांगलादेशमध्ये होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक (all-party meeting on the situation in Bangladesh ) झाली.  

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

India on Bangladesh Protest : आपला महत्त्वाचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या वेगानं घडामोडी घडत आहेत. बांगलादेशमधील लोकनियुक्त शेख हसीना (Sheikh Hasina) यांना सत्ता सोडावी लागली आहे. हसीना यांना देश सोडून भारतामध्ये आश्रय घ्यावा लागलाय. बांगलादेशची सूत्र लष्करानं ताब्यात घेतली आहेत. देशात लवकरच लोकनियुक्त सरकार स्थापन होईल अशी घोषणा त्यांच्या लष्करप्रमुखांनी केलीय. बांगलादेशमध्ये होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक (all-party meeting on the situation in Bangladesh ) झाली.  

विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या बैठकीत ढाकामध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर बांगलादेशबद्दल सरकारचे सध्याचे आणि दीर्घकालीन धोरण काय आहे? याबाबत प्रश्न विचारला अशी माहिती, सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ( S. Jaishankar) यांनी यावेळी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. केंद्र सरकारचं बांगलादेशच्या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे, असं त्यांनी सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पाकिस्तानवर प्रश्न

बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बदललेली परिस्थितीमध्ये विदेशी शक्तींचा विशेषत: पाकिस्तानचा हात आहे का? असा प्रश्नही यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी  विचारला. त्यावर केंद्र सरकार या अँगलनं तपास करत आहे, असं उत्तर जयशंकर यांनी दिलं. 

पाकिस्तानचा उच्चायुक्त त्यांच्या सोशल मीडियावरील डिस्प्ले पिक्चर सातत्यानं बदलत आहेत. बांगलादेशमधील आंदोलन दाखवणारे फोटो ते डिस्प्ले पिक्चर म्हणून लावत असल्याचं सरकारनं यावेळी सांगितलं, अशी माहिती या बैठकीतील सूत्रांनी दिलं. या विषयावर आणखी सखोल चौकशी सुरु असल्याचं सरकारनं यावेळी स्पष्ट केलं. 

Advertisement

( नक्की वाचा : बांगलादेशमध्ये सत्ताबदल करणारा विद्यार्थी नेता Nahid Islam कोण आहे? )
 

'बांगलादेशमधील नाट्यमय घटनांचा नवी दिल्लीनं अंदाज घेतला आहे का?' असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला. त्यावर भारत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

बांगलादेशमधील परिस्थितीमुळे निर्माण होणारे प्रश्न हातळण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी यावेळी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही या बैठकीनंतर सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये या बैठकीत झालेल्या एकमताबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

( नक्की वाचा : शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं? )
 

Advertisement

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी बांगलादेशमधील बदललेल्या परिस्थितीची तसंच पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर राजीनामा देण्याची तसंच देश सोडण्याची वेळ का आली? याबाबत माहिती दिली. शेख हसीना यांनी सोमवारी बांगलादेश सोडला. त्यानंतर त्या सध्या भारतामध्ये असून लवकरच ब्रिटनमध्ये आश्रय घेण्याची शक्यता आहे.