- उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील राठ येथील लग्न दुसऱ्या दिवशी तुटले
- नवरी मिथिलेश कुमारीने सांगितले की तिचे दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे.
- दोन्ही पक्षांनी तासनतास पोलीस ठाण्यात चर्चा करून आपापसांत संमतीने घटस्फोट करण्याचा निर्णय घेतला
लग्न हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. प्रत्येक जण आपल्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत असतो. ते कसं धुमधडाक्यात होईल याची ही खास सोय केली जाते. तर मोठे-थोर मुलांची लग्न झाली तर त्यांचं आयुष्या मार्गी लागेल असा विचार करत असतात. पण काही लग्न फसतात. तर काही लग्न यशस्वी होतात. सध्या अशाच एका लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. त्यात एका रात्रीची बायको ही गोष्ट समोर आली आहे. या मागची धक्कादायक कहाणी ऐकून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर सर्वच जण हादरले आहेत. विलरख गावात मिथिलेश कुमारी ही तरुणी राहत होती. हिचा विवाह राठ येथील धरम सिंह कुशवाहा याच्याशी अत्यंत थाटामाटात पार पडला. मात्र, सासरी पोहोचल्यानंतर पहिल्याच रात्री नवरीने पतीसोबत राहण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आणि अवघ्या 24 तासांत या लग्नाचा अंत झाला. हे लग्न का नको याचे कारण ही मिथिलेश कुमारी हिने सांगितले. त्यामुळे तर वेगवेगळी चर्चाच सुरू झाली. शेवटी लग्न तुटलेच.
नक्की वाचा - Kalyan news: तरुणाला भटका कुत्रा चावला, भीतीने त्याने भयंकर प्रकार केला, सगळेच हादरले
लग्न झाल्यानंतर नवरा नवरीची सुहागरात्र होती. पण त्याच वेळी मिथिलेश कुमारीने आपल्याला तुमच्या सोबत राहायचे नाही असे नवऱ्याला सांगितले. हा नवऱ्यासाठी मोठा धक्का होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हे प्रकरण राठ कोतवाली पोलीस ठाण्यात गेले. तिथे मिथिलेश कुमारीने धक्कादायक खुलासा केला. तिचे दुसऱ्या एका तरुणावर प्रेम असून घरच्यांनी मारहाण करून तिचे लग्न लावून दिल्याचे तिने सांगितले. "मला माझ्या प्रियकरासोबतच राहायचे आहे," या जिद्दीवर ती ठाम होती. पोलिसांनी आणि कुटुंबीयांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तिने कोणाचेही ऐकले नाही.
दुसरीकडे, नवरदेव धरम सिंह याने आपली व्यथा मांडली. "जर तिने लग्नापूर्वीच हे सांगितले असते, तर एवढी बदनामी झाली नसती," असे तो म्हणाला. पोलीस ठाण्यात तासनतास चाललेल्या हायव्होल्टेज पंचायतीनंतर, दोन्ही पक्षांनी आपापसातील संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्यातच तडजोड होऊन त्यांचा घटस्फोट झाला. नवरी आपल्या माहेरी परतली. नवरदेव धरम सिंह याने सांगितले की, लग्नाचे सर्व विधी आनंदाने पार पडले, पण सासरी येताच नवरीचे रूप बदलले. दरम्यान दुसऱ्या दिवशीच या दोघांचा घटस्फोट झाला. त्यामुळे या लग्नानंतर एक रात्रीची बायको याचीच चर्चा संपूर्ण गावात रंगली होती.
राठ कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश सिंह यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांना समजवण्याचा खूप प्रयत्न झाला. मात्र, नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती. अखेर सामाजिक प्रतिष्ठा आणि भविष्याचा विचार करून दोन्ही बाजूंनी संमतीने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. अवघ्या काही तासांत लग्न मोडल्याने नवरदेव आणि त्याचे कुटुंब हवालदिल झाले आहेत.ही घटना ग्रामीण भागातील कौटुंबिक दबाव आणि विसंगत विवाहाच्या समस्या अधोरेखित करते. तासनतास चाललेल्या चर्चेनंतर नवरी आपल्या पालकांसोबत माहेरी निघून गेली. या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असून, विवाह करताना मुला-मुलींच्या संमतीला किती महत्त्व द्यावे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.