- बिहारच्या पी. एन. ठाकूर यांनी मस्त बनारसी पान ब्रँडद्वारे पानाला आलिशान कॅफे संस्कृतीमध्ये स्थान दिले आहे
- त्यांनी तंबाखूमुक्त ८० हून अधिक प्रकारच्या पानांची निर्मिती करून बाजारपेठेत नवीन संकल्पना आणली आहे
- २०१६ मध्ये मोरादाबादमध्ये सुरू झालेला व्यवसाय आता देशातील ३०० शहरांमध्ये पोहोचला आहे
एकेकाळी रस्त्याच्या कोपऱ्यावर मिळणारे पान आता आलिशान कॅफेचा भाग बनले आहे. एका साध्या पानाला ब्रँडचं स्वरूप देऊन बिहारच्या पी. एन. ठाकूर यांनी व्यवसायाचं नवं गणित मांडलं आहे. 'मस्त बनारसी पान' या ब्रँडच्या माध्यमातून त्यांनी आज 300 हून अधिक शहरांमध्ये आपलं जाळं पसरवलं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून कोणी पानाचा स्टॉल टाकेल, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण बिहारच्या पी. एन. ठाकूर यांनी हे केवळ करून दाखवले नाही, तर त्यातून 7 कोटींची उलाढाल असलेली कंपनी उभी केली आहे.
'मस्त बनारसी पान' या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी पानाला 'कॅफे संस्कृती'मध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे. स्वच्छतेचा अभाव आणि तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिमा पुसून त्यांनी तंबाखूमुक्त पानांच्या 80 प्रजाती बाजारात आणल्या आहेत. बिहारमधील बक्सर येथील रहिवासी असलेल्या पी. एन. ठाकूर यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) एमबीए पूर्ण केले. सुरुवातीला काही काळ नोकरी केल्यानंतर, त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. जेव्हा त्यांनी पान विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला. मात्र, पत्नी माया कुमारी यांनी खंबीर साथ दिली. स्वतःची नोकरी सोडून बचतीचे 2 लाख रुपये व्यवसायासाठी दिले.
ठाकूर यांनी 2016 मध्ये उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथून पहिला स्टॉल सुरू केला. त्यांनी अस्वच्छ पानाच्या टपऱ्यांच्या जागी हायजीनिक आणि फॅमिली फ्रेंडली 'पान कॅफे' संकल्पना आणली. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे मिळणारी सर्व पाने ही तंबाखूमुक्त आहेत. आज त्यांच्याकडे चॉकलेट पान, मँगो पान, ड्राय फ्रूट आणि चक्क गोल्ड-सिल्व्हर पान अशा 80 हून अधिक व्हरायटी उपलब्ध आहेत.
कोणत्याही बाह्य गुंतवणुकीशिवाय (External Funding) ठाकूर यांनी हा व्यवसाय 7 कोटींच्या टप्प्यावर नेला आहे. सध्या पुणे, बंगळूर, दिल्ली आणि हैदराबादसह देशातील 300 शहरांमध्ये त्यांची 400 हून अधिक दुकाने आहेत. एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने जिद्दीच्या जोरावर असंघटित क्षेत्राला एका मोठ्या कॉर्पोरेट ब्रँडमध्ये रूपांतरित करून दाखवले आहे. चिकाटी आणि कल्पकता असेल तर कोणत्याही व्यवसायाचे सोने करता येते, हे पी. एन. ठाकूर यांनी सिद्ध केले आहे.