रामराजे शिंदे, प्रतिनिधी
संपूर्ण जगभरात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. लाडक्या बाप्पाचं वाजत-गाजत स्वागत केल्यानंतर आता त्यांना जय्यत निरोप देण्याची तयारी देखील सुरु झाली आहे. गणपती विसर्जनापूर्वी गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ढोल ताशा पथकावरील निर्बंध हटवले आहेत. याबाबतच्या एनजीटीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'गणेशोत्सव पुणेकरांच्या हृदयात'
ढोल ताशा पथकात 30 पेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नसल्याचा आदेश एनजीटीनं दिला होता. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. गणेशोत्सव पुणेकरांच्या हृदयात वसला आहे. पुणेकरांना गणेशोत्सव त्यांच्या मनासारखा साजरा करू द्या, असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी या प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान केलं.
विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा गटांची संख्या कशी मर्यादित ठेवता येईल, असा सवाल याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाला केला होता, त्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला.
( नक्की वाचा : Ayushman Bharat : मोदी सरकारचा मोठा निर्णय, 70 वर्षांवरील नागरिकांना होणार फायदा )
काय होता NGT चा आदेश ?
एनजीटीच्या पश्चिम खंडपीठाने 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी ढोल ताशा ग्रुपच्या 30 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही, अशा सूचना दिल्या होत्या.
NGT ने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 चे पालन करून या वर्षीच्या गणपती उत्सवादरम्यान ध्वनी पातळी नियंत्रित आणि निरीक्षण करण्यासाठी पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना निर्देश जारी केले होते. सर्वोच्च न्यायालयानं या आदेशाला स्थगिती दिल्यानं गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.