Sarla Maheshwari Death News: दूरदर्शनच्या सुवर्ण काळातील अविभाज्य भाग असलेल्या प्रसिद्ध वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय टीव्ही पत्रकारितेतील एका गौरवशाली पर्वाचा अंत झाला असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. साधेपणा, स्पष्ट उच्चार आणि विश्वासार्हता ही त्यांची ओळख होती, ज्यामुळे त्यांनी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
टीव्ही पत्रकारितेतील सुवर्ण युगाचा अंत
सरला माहेश्वरी यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ऑल इंडिया महिला काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरला यांची कामाप्रती असलेली निष्ठा, त्यांची विश्वासार्हता आणि शालीनता येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
आज होणार अंतिम संस्कार
सरला माहेश्वरी यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील निगम बोध घाट येथे सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडतील. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पत्रकारिता आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी दुःख व्यक्त केले आहे.
( नक्की वाचा : Land Law Changes: जमीन आहे पण 'एनए' नाही? काळजी नको! सरकारने नियमात केलाय मोठा बदल, वाचा सविस्तर )
एक शांत आणि आश्वासक आवाज
सरला माहेश्वरी यांना त्यांच्या बातमी सांगण्याच्या खास शैलीसाठी नेहमीच ओळखले जाईल. त्यांच्या आवाजात एक वेगळीच शांतता आणि ओघवतेपणा होता, ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या बातम्यांकडे ओढले जात असत. ज्या काळात बातम्यांमध्ये आजच्या सारखा गोंधळ किंवा ड्रामा नसायचा, त्या काळात त्यांनी बातम्यांना एक सन्माननीय आणि सुसंस्कृत ओळख मिळवून दिली होती. तेव्हाच्या काळात न्यूज अँकर हाच त्या बातमीच्या सत्यतेचा पुरावा मानला जात असे.
चाहते हेलावले
सोशल मीडियावर देखील त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका चाहत्याने लिहिले की, त्या अशा काळातील अँकर होत्या जेव्हा बातमीचा अर्थ स्पष्टता असा असायचा. आजच्या काळात त्यांच्यासारखा ग्रेस आणि साधेपणा पाहायला मिळत नाही. आम्ही त्यांना ऐकत आणि पाहत मोठे झालो आहोत, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात सदैव अजरामर राहील.