- श्री श्री रविशंकर यांच्या व्हिडिओत पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करून इंधन म्हणून वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवले
- महेश जी यांनी शोधलेल्या यंत्रामुळे अर्धा लीटर पाण्यावर गॅस सिलिंडरशिवाय चुल पेटवता येऊ शकते
- या तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जन होत नाही आणि स्वयंपाकघरातील प्रदूषण कमी होण्याचा दावा केला जात आहे
Sri Sri Ravishankar Video: देशात सध्या एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सर्वत्र संभ्रमाचं वातावरण आहे. किती दिवस गॅस आणि पेट्रोल पुरणार याची चर्चा देशभरात सुरू आहे. त्यात आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करून त्याचा इंधन म्हणून वापर कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिक या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच हे 'वॉटर गॅस' तंत्रज्ञान चर्चेत आले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी या तंत्रज्ञानाचे श्रेय महेश जी नामक व्यक्तीला दिले आहे. "महेश जी यांनी एक नवीन शोध लावला आहे. ज्याद्वारे अर्धा लीटर पाण्यावर कोणताही सिलिंडर न वापरता चुल पेटवता येईल. हे मशीन पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करते. ऑक्सिजन हवेत सोडला जातो आणि हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून केला जातो," असे त्यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
एलपीजी गॅसच्या थेट ज्योतीवर शिजवलेले अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले. या नवीन पद्धतीमुळे कार्बन उत्सर्जन होणार नाही आणि स्वयंपाकघरातील प्रदूषणही कमी होईल. सुरुवातीला हा प्रकल्प आश्रमात प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. व्हिडिओमध्ये श्री श्री रविशंकर म्हणतात की, "आता अर्ध्या लीटर पाण्यावर चुल पेटणार आहे. गॅस सिलिंडरची अजिबात गरज भासणार नाही. हे मशीन हायड्रोजन इंधनाचा वापर करते, ज्यामुळे प्रदूषणही होत नाही असा दावा केला आहे.
हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास हॉटेल आणि घराघरातील महागड्या एलपीजी सिलिंडरवरचे अवलंबित्व संपू शकते, असा दावा केला जात आहे. एलपीजीमुळे अन्नावर पडणारा काळा थर आरोग्यासाठी घातक असतो, असे सांगत त्यांनी या वॉटर-बेस्ड सिस्टमचे कौतुक केले आहे. या सिस्टीममध्ये कार्बन नसल्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ राहील आणि हवाही शुद्ध राहील. पाण्यातील रेणू वेगळे करून (Electrolysis पद्धतीने) हायड्रोजन मिळवणे हा ऊर्जेचा शाश्वत स्रोत मानला जातो. जर हे तंत्रज्ञान सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्यात आले, तर गॅसच्या रांगेतून आणि वाढत्या बिलातून मोठी सुटका होऊ शकते. सध्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये गॅसच्या शॉर्टेजमुळे चिंतेचे वातावरण असताना हे तंत्रज्ञान आशेचा किरण ठरत आहे.